लोकनेते देसार्इंचे राज्यात मोलाचे योगदान : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:55 IST2019-01-21T23:55:04+5:302019-01-21T23:55:32+5:30
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रमुख भूमिका निभावली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा महान पुुरुषाचे स्मारक यापूर्वीच व्हायला पाहिजे होते,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दौलतनगर-मरळी, ता. पाटण येथे सोमवारी लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शंभूराज देसाई आदी उपस्थित होते.
पाटण : ‘लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रमुख भूमिका निभावली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा महान पुुरुषाचे स्मारक यापूर्वीच व्हायला पाहिजे होते,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दौलतनगर-मरळी (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाचे उद्घाटन आणि पाटण तालुक्यात ५२ नवीन नळ योजनांच्या ई-भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, मंत्री सदाभाऊ खोत, मंत्री बबनराव लोणीकर, खासदार उदयनराजे भोसले, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित पाटील, आमदार उदय पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार अनिल बाबर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, विजयादेवी देसाई, रविराज देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याचा जो भाग दुष्काळी आहे, तेथे पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत. राज्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यांना रस्ते आणि पाणी योजना देण्यासाठी आम्ही लवकरच एक नवी योजना अंमलात आणणार आहे. तारळी धरणातून पन्नास मीटरच्यावर पाणी उचलून देणे, ही योजना अशक्य होती. मात्र, शंभूराज देसाई यांनी पाठपुरावा केल्यामुळेच २ हजार ५०० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.’ खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी भाजपवर स्तुतीसुमने उधळली. तर आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. ‘भाजप आणि सेना सरकारच उत्कृष्ट असून, त्यांच्या मंत्रिमंडळात जे निर्णय झाले, ते यापूर्वी झाले नाहीत. यापूर्वी फक्त घोषणा झाल्या.
लोकनेत्यांना पद्मभूषण द्या!
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. ते महसूल, बांधकाम, शिक्षण, गृहमंत्री आणि विधानसभेचे सभापती होते. तेव्हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पद्म किंवा पद्मविभूषण पुरस्कार मिळावा. यासाठी मुख्यमंत्री आणि शासनाने केंद्राकडे शिफारस करावी. किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी करून मोरणा-गुरेघर उजवा कालवा बदल करणे आणि भूकंप दाखला निकष बदलणे तसेच वाड्या-वस्त्यांना रस्ते देण्यास येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी यावेळी आमदार शंभूराज देसाई यांनी केली.
सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान होऊ दिले नाही!
ज्यांनी देश उभा केला, त्या सरदार पटेल यांच्यावर राजकीय अन्याय झाला. त्यामुळे त्यांना पंतप्रधान होता आले नाही. त्याप्रमाणेच सर्व क्षमता असणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांना त्यावेळी राजकीय डावपेच करून मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महिन्यानंतर माझे लग्न, नंतर तुम्हा सर्वांचे..
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘मी काय आहे, हे मला माहीत आहे. आणि तुम्हालाही. लोकनेते कुणाला म्हणायचे, हे लोकांनी ठरवायचे असते. एका बाजूला मुख्यमंत्री आणि माझ्या दुसºया बाजूला पालकमंत्री बसले आहेत. त्यामुळे माझी अवस्था उंदरासारखी झाली आहे; पण एक लक्षात ठेवा, एक महिन्यानंतर माझे लग्न आहे आणि नंतर तुमचे.’ उदयनराजेंच्या या मिश्किलीवर जोरदार हशा पिकला.