सांस्कृतिक विभागाकडून मार्चपर्यंत राज्यात १२०० कार्यक्रम होणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
By नितीन काळेल | Updated: June 11, 2025 21:54 IST2025-06-11T21:54:11+5:302025-06-11T21:54:21+5:30
साताऱ्यातील शाहिरी महोत्सवाचा समारोप

सांस्कृतिक विभागाकडून मार्चपर्यंत राज्यात १२०० कार्यक्रम होणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्याची माती पराक्रम, त्याग, बलिदान आणि समर्पित वृत्तीची आहे. हा परिसर समृध्द, संपन्न असून कला व संस्कृती जपणाराही आहे. त्यामुळे साताऱ्यात शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आता सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मार्च महिन्यापर्यंत राज्यात १ हजार २०० कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.
साताऱ्यातील शाहू कला मंदिरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोपात मंत्री शेलार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, आमदार मनोज घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी नीलेश धुमाळ, भाजप प्रदेश सांस्कृतिक आघाडी सदस्य पंकज चव्हाण, शिरीष चिटणीस आदी उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार म्हणाले, आक्रमणे ही युध्दाच्या रुपाने येतात. पण, एेतिहासिक प्रथा, परंपरा, संस्कृती जीवंत राहते तोच देश टिकतो. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम होत असतात. आता मार्च महिन्यापर्यंत चित्रपट, कला, संस्कृती, लोककलांचे १ हजार २०० कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शाहिरी ही उर्जा आणणारी कला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळापासून शाहिरीला सुरूवात झाली. राष्ट्रनिर्मितीतही शाहिरांचे मोठे योगदान राहिले. तर महाराष्ट्राच्या निर्मितीवेळच्या संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्यावेळी शाहिरांनी दिलेले योगदानही आपणाला विसरता येत नाही.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात शाहिरांचे योगदान मोठे आहे. शहरांचा विकास सांस्कृतिकही असावा. साताऱ्यात शाहिरी महोत्सव झाला. याला सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
लोककला जपल्या पाहिजेत. त्यामुळे शासन त्यांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न करत आहे. डिजीटल क्रांतीत मात्र, लोककला लोप पावत आहेत. ही संस्कृती आणि आपला इतिहास लोकांसमोर जाण्यासाठी शाहिरीही टिकायला हवी, असे आमदार मनोज घाेरपडे यांनी सांगितले.