वनक्षेत्रात पार्टी करणा-या पाच युवकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:30 IST2020-07-21T20:24:39+5:302020-07-21T20:30:31+5:30
: सध्या कोरोना विषाणू संकटामुळे सातारा जिल्ह्यात लॉकडावून व संचारबंदी लागू असून वाई वनपरिक्षेत्रामार्फत वारंवार याबाबत जनजागृती करुन लोकांना जंगलात फिरणे, पार्टी करणे याबाबत सुचना दिल्या आहेत. तरीही याचे उल्लंघन करुन श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी वनक्षेत्रात मांसाहाराची पार्टी करत असल्याचे आढळून आले. वनक्षेत्रात पार्टी केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

वनक्षेत्रात पार्टी करणा-या पाच युवकांवर गुन्हा दाखल
वाई : सध्या कोरोना विषाणू संकटामुळे सातारा जिल्ह्यात लॉकडावून व संचारबंदी लागू असून वाई वनपरिक्षेत्रामार्फत वारंवार याबाबत जनजागृती करुन लोकांना जंगलात फिरणे, पार्टी करणे याबाबत सुचना दिल्या आहेत. तरीही याचे उल्लंघन करुन श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी वनक्षेत्रात मांसाहाराची पार्टी करणा-या पाच युवकांवर गुन्हा नोंद केला आहे.
मंगळवारी (दि.२१ ) जांभळी ता. वाई येथे वनरक्षक संदिप पवार व वनरक्षक प्रदिप जोशी हे फिरती करीत असताना राखीव वनक्षेत्रामध्ये जांभळी पर्यटन क्षेत्राचे हददीत पॅगोडा जवळ चूल मांडून टोपामध्ये मांसाहाराचे जेवण बनवित असताना संशयित अजित हणमंत सणस ( वय २१ ) अशोक नामदेव चौधरी ( वय २१), सागर रामचंद्र चोरट (वय २३), साहील गजानन सणस (वय १८ ), सुरज नारायण सणस (वय २६, सर्व राहणार आसरे ता. वाई) हे आढळून आले.
आरोपींकडून मांस शिजवण्यासाठी वापरलेले पातेले १, चिकन मांस तुकडे, माचीस व स्वयंपाक बनविण्याचे साहित्य पंचनामा करुन जप्त केले. सर्व तरुण वनक्षेत्रात प्रवेश करुन पार्टी करण्याच्या उद्देशाने आले होते. व त्यांनी वनक्षेत्रात आग निर्माण केली, त्याबाबत भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१), (ड), (फ) चे उल्लंघन झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
उपवनसंरक्षक सातारा भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक व्ही. व्ही. भडाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी वाई महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास वनपाल भाऊसाहेब कदम, वनरक्षक संदिप पवार, प्रदिप जोशी हे करीत आहेत.