भाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर, निष्ठावंतांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:10 PM2019-08-27T13:10:21+5:302019-08-27T13:16:23+5:30

विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी झालेल्या भाजप-शिवसेनेच्या युतीला अजूनही आयात उमेदवारांच्या भरवशावरच बसावे लागले आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीची भिस्त ही आयात उमेदवारांवरच अवलंबून आहे.

BJP-Sena trust imports candidates! | भाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर, निष्ठावंतांची गोची

भाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर, निष्ठावंतांची गोची

Next
ठळक मुद्देभाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर,निष्ठावंतांची गोची युतीची पावले फुटीच्या दिशेने; मावळ्यांवर जिंदाबाद म्हणण्याची वेळ

सागर गुजर 

सातारा : विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी झालेल्या भाजप-शिवसेनेच्या युतीला अजूनही आयात उमेदवारांच्या भरवशावरच बसावे लागले आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीची भिस्त ही आयात उमेदवारांवरच अवलंबून आहे.

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वाई-खंडाळा-महाबळेश्वर, पाटण, कऱ्हाड  उत्तर, कऱ्हाड दक्षिण, कोरेगाव या पाच मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.

या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे आमदार मकरंद पाटील, सत्यजित पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आ. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याने या मंडळींनी कामाला सुरुवात केलेली आहे.

दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना या पक्षांतर्फेही काहींनी तयारी केलेली आहे. मात्र, त्यांच्या तयारीवर विरजण टाकण्याचे काम त्यांच्याच नेत्यांकडून केले जात असल्याचे दिसते. दोन्ही पक्षांच्या युतीचे घोडे अजूनही जागा वाटपात अडकून पडलेले आहे.

शिवसेनेला युती हवी असली तरी २८८ पैकी निम्म्या म्हणजे १४४ जागा हव्या आहेत, त्याउलट एवढ्या जागा देणे अशक्य असल्याची माहिती भाजपचे नेते वारंवार देत आहेत. शिवसेनेच्या ६३ व भाजपच्या १२२ विद्यमान जागा जैसे थे ठेवून उर्वरित १०३ जागांबाबत वाटपाचा विचार भाजपने सुरू केलेला आहे.

दुसऱ्या बाजूला आयातांची मेगा भरती दोन्ही पक्षांनी सुरूच ठेवल्याने युतीतर्फे इच्छुक असणाऱ्या संभावित उमेदवारांमध्ये संभ्रमावस्थेचे वातावरण आहे. या परिस्थितीत दोन्ही पक्ष शेवटच्या क्षणी युती फोडून वेगवेगळे लढण्याचीही शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे दीपक पवार, अमित कदम यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल, असा अंदाज होता; परंतु राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये गेल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना सध्याच्या घडीला तरी युतीमधून दुसरा स्पर्धक नसल्याचे चित्र आहे.

वाई विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचा सामना राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्याशी पारंपरिक पद्धतीने होणार आहे. माण-खटाव मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांची भाजपमध्ये जाण्याची जोरदार तयारी सुरू आहे, तर त्यांना भाजपमधूनच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा विरोध आहे. त्यातूनही आ. गोरे यांनाच भाजपने उमेदवारी दिली तर या ठिकाणी मोठा भडका उडण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या शेखर गोरे यांच्या हातात शिवबंधन बांधले आहे.

फलटणमधून भाजपतर्फे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे समर्थक दिगंबर आगवणे यांनी तयारी सुरू केली असली तरी त्यांचे विरोधक असणारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या संपूर्ण गटाने भाजपची दारे ठोठावल्याने आगवणे यांची गोची झाली आहे. महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनीही फलटण मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केली असल्याने भाजपमधून तिघे इच्छुक होण्याची शक्यता आहे.

कऱ्हाड उत्तरमधून भाजपतर्फे जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वीपासूनच तयारी सुरू केलेली आहे. कऱ्हाड दक्षिणमधूनही विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, कोरेगावातून महेश शिंदे यांना भाजपची उमेदवारी निश्चितपणे मिळणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.

या ठिकाणी जर भाजपने इनकमिंग केले तर आणखी क्लिस्ट परिस्थिती निर्माण होणार आहे. रोजच्या रोज नव्या घडत आहेत. राष्ट्रवादीत निष्ठावंत म्हणवून घेणारे कुठल्याही क्षणी रंग बदलत आहेत.

सतरंज्या उचलणाऱ्यांना दोन्ही काँग्रेसमध्ये महत्त्व...

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, विविध कार्यकारी सहकारी संस्था, बाजार समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, अशा परिस्थितीत राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून कधी कोण निघून जाईल, याचा भरवसा राहिला नसल्याने वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे महत्त्व आल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला सतरंज्या उचलायलाही कार्यकर्ते उरले नसल्याची विदारक परिस्थिती काँग्रेसमध्ये आहे.

Web Title: BJP-Sena trust imports candidates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.