फलटण : नीरा उजवा कालवा अस्तरीकरण विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर प्राथमिक यश मिळाले आहे. अस्तरीकरणासाठी नियुक्त खासगी कंपनीने तडवळे हद्दीत उभारलेला आरएमसी रेडीमिक्स काँक्रीट प्लांट हलवण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. सध्या प्लांटवरील साहित्य, यंत्रसामग्री गोळा करून ती हटवण्याचे काम सुरू आहे.मागील दोन वर्षांपासून नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. याला बळकटी देण्यासाठी २२ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन या प्रकल्पास ठाम विरोध करणारे ठराव मंजूर केले होते. कालव्याच्या अस्तरीकरणामुळे पाण्याचा झिरपण्याचा नैसर्गिक मार्ग बंद होईल, कालव्यालगतच्या विहिरी आणि बोअरवेल्स कोरड्या पडतील, परिणामी शेतीला गंभीर फटका बसेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.
ट्रॅक्टर मोर्चा अन् निवेदनेया लढ्यात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. हजारो शेतकरी, महिला या मोर्चात सहभागी झाले होते. फलटण येथे तत्कालीन प्रांताधिकारी सचिन ढोले आणि जलसंपदा विभागाचे उप अभियंता यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले होते की, अस्तरीकरण झाल्यास विहिरी व कूपनलिका बंद पडतील. त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अस्तरीकरण करू देणार नाही.
- बावीस ग्रामपंचायतींचा अस्तरीकरणाच्याविरोधात ठराव.
- हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा
- अस्तरीकरणामुळे विहिरी व बोअरवेल्स कोरड्या पडण्याची भीती.
- आरएमसी प्लांट हटवण्याची सुरुवात, काम थांबवले.
हा केवळ प्राथमिक विजय आहे. अंतिम यश तेव्हाच मान्य केले जाईल जेव्हा शासन हा प्रकल्प पूर्णतः रद्द करेल. कालव्याची पारंपरिक मातीची व मुरमाची रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेईल. - अमोल खराडे, शेतकरी तडवळे