सुशांत घोरपडेम्हैसाळ : कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयावर ठाम असून, दुसरीकडे जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेजवळ नवीन एक टीएमसी बॅरेज उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पाणी पातळी जास्त राहिली तर कृष्णा खोऱ्यातील नदीकाठच्या गावांवर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावातील शेतजमिनी पाण्याखाली जाण्याची भीती अनेक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या काही गावांचा समावेश आहे.हे प्रकल्प झाल्यानंतर पाणी किती अडणार ? नदीची पाणी पातळी किती राहणार ? पावसाळ्यात पाणी पातळी किती असणार ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.म्हैसाळ येथे बांधल्या जाणाऱ्या नव्या बॅरेजमुळे मागे कसबे डिग्रजपर्यंत बँक वॉटरची पातळी वाढणार असून म्हैसाळ, कनवाड, कुटवाड, ढवळी, अर्जुनवाड या गावातील शेतजमिनी जलमय होण्याची भीती आहे.यांचा फटका शेतकऱ्यांबरोबर व्यापारी व लघुउद्योग क्षेत्रालाही बसणार आहे. "सिंचनाचे फायदे काही मर्यादित ठिकाणी होत असले तरी त्याचा खालच्या भागातील जनजीवनावर मोठा विपरित परिणाम होणार आहे," असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने भविष्यात होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करूनच पुढील पावले टाकावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पावसाळ्यामध्ये जलसंपदा विभाग हा धरणातील गेट खुले करते, त्यामुळे म्हैसाळ येथे नव्याने होत असलेल्या बॅरेजमुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. - प्रभाकर केंगार, सेवानिवृत्त, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग, सांगली
एकीकडे अलमट्टी धरणाची उंची कर्नाटक सरकार वाढवत आहे. दुसरीकडे म्हैसाळ येथे नवीन बॅरेजचे काम सुरू आहे.हे दोन्ही प्रकल्प झाल्यानंतर पावसाळ्यात नेमके पाणी किती अडणार ? नदी पात्रात पाणी पातळी किती राहणार ? याबाबत कोणतीही कल्पना आम्हाला नाही. पावसाळ्यात पाणी पातळी जास्त राहिल्यास आम्हा शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. - एम. डी. पाटील, शेतकरी, म्हैसाळ