कुणी घ्या भाजप, कुणी घ्या सेना!
By Admin | Updated: July 5, 2014 23:58 IST2014-07-05T23:58:15+5:302014-07-05T23:58:32+5:30
दिनकरतात्या, घोरपडेंचे तळ्यात-मळ्यात : शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, सुहास बाबर शिवसेनेच्या वाटेवर

कुणी घ्या भाजप, कुणी घ्या सेना!
श्रीनिवास नागे ल्ल सांगली
लोकसभेच्या निकालानंतर आमदारकीचे डोहाळे लागलेले जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी भाजप-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पाळणा हलविण्याची तयारी करून आतापासूनच काहीजण ‘कुणी घ्या भाजप, कुणी घ्या सेना’ अशी साद घालत आहेत, तर काहीजण जागावाटपाच्या घुगऱ्या वाटल्यानंतरच महायुतीच्या बाळाला जोजवणार आहेत.
येत्या १३ जुलैला इस्लामपुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिराळ्यातून माजी मंत्री शिवाजीराव नाईक, पलूस-कडेगावमधून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि खनापूर-आटपाडीतून अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर शिवसेनेचा धनुष्यबाण उचलणार आहेत, तर जतमधून विलासराव जगताप, खनापूर-आटपाडीतून रासपचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर भाजपचे कमळ फुलविण्याच्या तयारीत आहेत. तासगाव-कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे, सांगलीतून माजी आमदार दिनकर पाटील, इस्लामपुरातून नाना महाडिक आणि त्यांचे चिरंजीव राहुल महाडिक, खानापूर-आटपाडीतून अनिल बाबर आणि अमरसिंह देशमुख हे मात्र जागावाटप निश्चित झाल्यानंतर आणि तिकिटाची हमी दिली तरच सेना-भाजपचा पर्याय स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे सांगलीतून काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, श्रीनिवास पाटील, नगरसेवक धनपाल खोत, तर इस्लामपूर आणि शाहूवाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचीही महायुतीतून चाचपणी सुरू आहे. ‘स्वाभिमानी’च्या अभिजित पाटील (इस्लामपूर), महेश खराडे (तासगाव-कवठेमहांकाळ), संदीप राजोबा (पलूस-कडेगाव) यांनी तर केव्हाचेच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील गणिते वेगवेगळी असतात, असे म्हटले जात असले तरी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, मोदी लाट आणि राज्यातील महायुतीचा प्रभाव अजून ओसरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दिग्गजांना महायुतीत जाऊन आमदार होण्याचे डोहाळे लागले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुसरी फळी आघाडीवर आहे. पक्षातील आधीच्या मंडळींत नव्याने येणाऱ्यांची भर पडल्याने भाजप-शिवसेनेत इच्छुकांची दाटी झाली आहे.
मागीलवेळी भाजप-सेना युतीच्या जागावाटपात जत, सांगली, मिरज मतदारसंघ भाजपकडे होते. शिवसेनेच्या वाट्याला शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, इस्लामपूर, पलूस-कडेगाव हे मतदारसंघ आले होते. त्यातील खानापूर-आटपाडीची जागा रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेला देण्यात आली होती. त्यापूर्वी इस्लामपूरची जागा भाजपकडे होती, ती मागीलवेळी सेनेला देण्यात आली.
यंदा महायुती झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आणि राष्ट्रीय समाज पक्ष हे पक्षही भाजप-सेनेसोबत दावेदार बनले आहेत. महायुतीने बाळसे धरल्याचे दिसताच सर्वच घटक पक्षांनी जागांवर दावे सुरू केले आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. तो वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल, पण तोपर्यंत जागावाटपात निश्चित मानल्या जागा पटकावण्यासाठी बाहेरून आलेले इच्छुक सरसावले आहेत.
जागावाटपाच्या दोरीला खरा तिढा बसला आहे खानापूर-आटपाडीत. महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी पक्षत्याग करून भाजपप्रवेशाची तयारी सुरू केली आहे. त्यांचे आमदारकीचे डोहाळे पुरवण्याचे भाजपने ठरवले तर राष्ट्रवादीतून भाजप-सेनेत येणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांची गोची होणार आहे. भाजपकडून तिकिटाची हमी मिळाल्याचा दावा पडळकर करत आहेत. मात्र त्यातील खरेखोटे समजण्यासाठी काही दिवस जावे लागतील. कारण महायुतीचे जागावाटप होताना ‘इलेक्टिव्ह मेरिट’ही पाहिले जाईलच. त्यामुळेच उमेदवारी मिळाल्याशिवाय पडळकर भाजपप्रवेश करणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत.
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडेंना नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचे संचालकपद देऊन राष्ट्रवादीने गप्प बसवले होते, पण आता पुन्हा त्यांनी आर. आर. पाटील यांच्याविरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. खा. संजयकाकांना त्यांनी केलेली मदत, हा भाजपमधील प्रवेशाचा आणि तिकिटाचा राजमार्ग मानला जातो. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी बोलणी केली आहेत, मात्र ही जागा भाजप की सेनेला, या वादामुळे ते थांबले आहेत. तथापि गेल्या दोन वर्षांपासून घोरपडेंनी या मतदारसंघात जोरदार पेरणी केली आहे. खा. संजयकाका आणि घोरपडेंनी मिळून आर. आर. पाटील यांना या मतदारसंघात ‘टार्गेट’ केले आहे.
संजयकाका पाटील खासदार झाल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधकांचे बाहू फुरफुरू लागले आहेत. विशेषत: अजितराव घोरपडे आक्रमक होऊ लागले आहेत. गाजावाजा न करता आर. आर. पाटील यांचा काटा काढण्याचा विरोधकांचा डाव राष्ट्रवादीने ओळखला आहे. गृहमंत्री पाटील यांच्याविरोधात राज्यभरातील विरोधक एकवटतात, हा मागील काही निवडणुकांचा अनुभव आहे. राष्ट्रवादीच्या काही मोजक्या ‘मास लीडर’मध्ये पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची मुलूखमैदान तोफ राज्यभर धडधडत ठेवण्यासाठी अजितराव घोरपडे यांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येईल आणि नंतर आर. आर. पाटील