सांगली : लोकसभा निवडणुकीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यांना मिळालेली जुनी चांदीची गदा पॉलिश करून उद्धव ठाकरे यांना दिल्यावर ते भाळले. त्यानंतर घाईने उमेदवारी जाहीर केली. परंतु उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचा विस्कुट केला. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी उद्धवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली.जाधव म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे आणि नितीन बानुगडे-पाटील यांना चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊ नका, त्यांना ७० हजारपेक्षा जास्त मते पडणार नाहीत असे सांगितले होते. चंद्रहार हे एकदाच जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकले आहेत. त्यांना केवळ कुस्ती केंद्र बांधायचे आहे. त्यासाठी बेसुमार वाळू, सिमेंट गोळा केले आहे. त्यांना उमेदवारी देऊन संजय राऊत यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचा विस्कुट झाला. शिवसेना संपुष्टात येत असल्यामुळे वाईट वाटते.
वाचा- “चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंतते पुढे म्हणाले, लोकसभेला चंद्रहार हे टिकणार नाहीत असे दिल्लीतील महाआघाडीच्या बैठकीतही सांगण्यात आले होते. तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली. ऐन निवडणुकीची धामधूम सुरू असताना संजय राऊत सांगलीतील हॉटेलमध्ये पाच दिवस का थांबले होते? याचे गौडबंगाल समजले नाही. पडद्यामागे काही हालचाली झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी जेवढा वेळ सांगलीत दिला, तेवढा मिरजेत विधानसभेला दिला असता तर जागा निवडून आली असती. परंतु लोकसभेला चुकीचा उमेदवार लादल्याचा फटका बसला.