‘ताकारी, टेंभू’चे ३२ कोटी थकीत : चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:57 IST2017-12-13T23:54:33+5:302017-12-13T23:57:57+5:30

कडेगाव : ताकारी योजनेची १० कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २१ कोटी ५० लाख वीजबिल थकबाकी असल्यामुळे हे थकबाकीचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान दोन्ही योजनांसमोर आहे.

 Thakir, Tembhu's 32 million Thakit: Challenge of Chakravyuh | ‘ताकारी, टेंभू’चे ३२ कोटी थकीत : चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान

‘ताकारी, टेंभू’चे ३२ कोटी थकीत : चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान

ठळक मुद्देसिंचन योजनांच्या अस्तित्वाची लढाई; वीज पुरवठा तोडलाऊस बिलातून वसूल केलेली पाणीपट्टी साखर करखान्यांकडून येणेबाकी

प्रताप महाडिक ।
कडेगाव : ताकारी योजनेची १० कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २१ कोटी ५० लाख वीजबिल थकबाकी असल्यामुळे हे थकबाकीचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान दोन्ही योजनांसमोर आहे. महावितरणने दोन्ही योजनांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. लाभक्षेत्रातील शेतीपिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. यामुळे आता दोन्ही योजनांचे आवर्तन सुरू होणे गरजेचे आहे.
ताकारी योजनेची जवळपास २ कोटी, तर टेंभू योजनेची २ कोटी ५० लाख इतकी शेतकºयांच्या ऊस बिलातून वसूल केलेली पाणीपट्टी साखर करखान्यांकडून येणेबाकी आहे. याशिवाय टंचाई उपाययोजना निधीतून दिलेल्या आवर्तनाची ताकारी योजनेची ४ कोटी, तर टेंभू योजनेची ६ कोटी इतकी रक्कम राज्य शासनाकडून येणेबाकी आहे.
आता दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील ऊस व अन्य बागायती पिकांसह रब्बी हंगामातील पिके वाळू लागली असताना, राज्य शासन मात्र याबाबत गंभीर नाही. कायम दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या या सिंचन योजनांची पाणी वितरण व पाणीपट्टी वसुली व्यवस्था सक्षम झाली नसल्यामुळेच पाणीपट्टीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय लाभक्षेत्र मोजणी व पाणीपट्टी आकारणी पारदर्शक पद्धतीने होत नाही. अनेक धनदांडगे शेतकरी अधिकाºयांना चिरीमिरी देऊन लाभक्षेत्र दडवितात. याचा भुर्दंड सर्वसामान्य शेतकºयांना सोसावा लागत आहे. लाभक्षेत्र वाढले की पाणीपट्टीचे दर कमी होतात, हे सरळ, साधे सूत्र आहे. धनदांडगे शेतकरी व काही अधिकाºयांमुळे ताकारी व टेंभू योजना वीजबिल थकबाकीच्या चक्रव्यूहात अडकल्या आहेत. ऊस वगळता अन्य पिकांची पाणीपट्टी वसुली होत नाही. याशिवाय पाणीपट्टी वसूल करून देणारे कारखाने वगळता अन्य कारखान्यांना ऊस घालणाºया शेतकºयांची पाणीपट्टी वसूल होत नाही.
योजना सुरु झाल्यापासून आजवर ताकारी योजनेची ३५ कोटी, तर टेंभू योजनेची २७ कोटी इतकी पाणीपट्टी थकबाकी शेतकºयांकडून येणेबाकी आहे. महावितरण कंपनीने थकीत वीज बिलासाठी वीज खंडित केल्यानंतर शेतकºयांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांच्या माध्यमातून पाणीपट्टी वसूल केली जाते. वसूल रक्कम भरून योजना कार्यान्वित केली जाते. त्यानंतर पुन्हा पाणीपट्टी वसुलीची मोहीम थंडावते. पाटबंधारे विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळेच सिंचन योजनांच्या थकबाकीचा डोंगर वाढत आहे. महावितरणकडून थकबाकीसाठी सिंचन योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित केला जातो.
सध्या ताकारी योजनेची साडेदहा कोटी व टेंभू योजनेची साडेएकवीस कोटी वीजबिल थकबाकी आहे. पाटबंधारे विभागाकडून ताकारी योजनेची किमान ५ कोटी ११ लाख, तर टेंभू योजनेची किमान ६ कोटी वीजबील थकबाकीची रक्कम भरुन उर्वरित वीजबिल भरण्याची हमी दिल्याशिवाय योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत न जोडण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. शासनाकडून येणेबाकी असलेली टंचाई उपाययोजना निधीची संबंधित आवर्तन कालावधीतील रक्कम व साखर कारखान्यांकडून येणेबाकी असलेली रक्कम भरेपर्यंत रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसह ऊस, भाजीपाला, द्राक्षबागा आदी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत.

आज कडेगावात : काँग्रेसचा एल्गार
ताकारी व टेंभू या दोन्ही योजनांचे आवर्तन तातडीने सुरु करावे तसेच दोन्ही योजनांची वाढीव पाणीपट्टी रद्द करावी, यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम व जितेश कदम यांच्या पुढाकाराने काँग्रेससह विविध पक्ष व संघटनांनी राज्य शासनाविरुद्ध कडेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. हा मोर्चा गुरुवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता मोहरम चौकातून निघणार आहे.

Web Title:  Thakir, Tembhu's 32 million Thakit: Challenge of Chakravyuh