सांगली जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’कडून तोडफोड-पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:57 IST2018-12-28T00:57:10+5:302018-12-28T00:57:57+5:30

संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा

Swabhimani demanded inquiry into corruption in drinking water and drinking water scheme in Sangli Zilla Parishad | सांगली जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’कडून तोडफोड-पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

सांगली जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’कडून तोडफोड-पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

ठळक मुद्देआंदोलक आक्रमक : संख येथील शासनाच्या पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

सांगली : संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर हल्ला करुन तोडफोड केली. कार्यालयातील प्लास्टिकचे पार्टिशन फोडले. यावेळी विभागाच्या कक्ष अधिकारी किरकोळ जखमी झाल्या. तोडफोडप्रकरणी रात्री उशिरा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संख येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप अपूर्ण आहे. या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे. गुरूवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून आंदोलकांना प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले होते. पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता अशोक खाडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना हे पत्र दिले होते.

सायंकाळी पाचच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, महावीर पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, महादेव बागेळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयात येऊन, आम्हाला केवळ आश्वासन नको, तर दोषींवर गुन्हा दाखल करण्याबाबतच्या निर्णयाचे पत्र हवे, अशी मागणी केली. ठोस कारवाईच्या पत्रासाठी कार्यकर्ते आग्रही होते. यावरून झालेल्या वादावादीमध्ये कार्यकर्त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातील पार्टिशनची तोडफोड केली. यावेळी विभागाच्या कक्ष अधिकारी कल्पना रेंगडे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. पार्टिशनचे तुकडे कार्यालयात अस्ताव्यस्त पडले होते. पोलिसांनी पंचनामा करून उपस्थित कर्मचाºयांचे जबाब नोंदवून घेतले.

आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तोडफोड करणाºया कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे उपस्थित होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दुसºया दिवशी कारवाईचे पत्र
संख येथील राष्टÑीय पेयजल योजनेच्या कामातील अनियमितताप्रकरणी ग्रामस्थांनी विविध पातळीवर पाठपुरावा केला होता. बुधवारपासून बेमुदत उपोषण आंदोलनास सुरूवात करण्याअगोदर त्यांनी जिल्हाधिकाºयांनाही निवेदन सादर केले होते. तालुकापातळीवरही त्यांनी पाठपुरावा केला होता. तरीही चौकशी होत नसल्याने आंदोलनास सुरूवात केली होती. आंदोलनाच्या दुसºयादिवशी प्रशासनाकडून चौकशी करून कारवाईचे पत्र देण्यात आले होते.
 

तोडफोडीनंतर घोषणाबाजी
तोडफोड केल्याचे समजताच पोलिसांनी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘खासदार राजू शेट्टी यांचा विजय असो’, ‘मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या’, ‘भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना चौकशीसाठीही थांबवून ठेवले होते.

Web Title: Swabhimani demanded inquiry into corruption in drinking water and drinking water scheme in Sangli Zilla Parishad