सांगली जिल्ह्यात १७.२५ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 13:18 IST2020-04-29T13:17:47+5:302020-04-29T13:18:59+5:30

कोरोनामुळे सर्वच कारखाने ऊस उपलब्ध असूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू ठेवू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे ऊसतोड मजूर गावी परतल्यामुळे ऊस शिल्लक असतानाही काही कारखाने बंद करावे लागले. हुतात्मा कारखान्याने दि. २६ एप्रिलपर्यंत हंगाम कसाबसा चालू ठेवला. पण, त्यांनाही गतवर्षीचा आकडा पार करता आला नाही.

In Sangli district, sugar production declined by 17.25 lakh quintals | सांगली जिल्ह्यात १७.२५ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले

सांगली जिल्ह्यात १७.२५ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले

ठळक मुद्देउत्पादन कमी असूनही लॉकडाऊनमुळे साखर खरेदीसाठी व्यापारी बाहेर पडत नसल्यामुळे कारखानदार चिंतेत आहेत.

सांगली : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५ लाख ५६ हजार ९६४ टन उसाचे गाळप कमी झाले असून, १७ लाख २५ हजार १०९ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. लॉकडाऊनमुळे कारखान्यांच्या साखर विक्रीवर परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात १८ साखर कारखाने असून त्यापैकी माणगंगा, केन अ‍ॅग्रो, महांकाली, डफळे, यशवंत, तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम बंद राहिले. उर्वरित १२ साखर कारखान्यांनी हंगाम पूर्ण केले. हंगाम सुरू करण्यापासून ते संपेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला.

कोरोनामुळे सर्वच कारखाने ऊस उपलब्ध असूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू ठेवू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे ऊसतोड मजूर गावी परतल्यामुळे ऊस शिल्लक असतानाही काही कारखाने बंद करावे लागले. हुतात्मा कारखान्याने दि. २६ एप्रिलपर्यंत हंगाम कसाबसा चालू ठेवला. पण, त्यांनाही गतवर्षीचा आकडा पार करता आला नाही.

एकमेव उदगिरी शुगरने गतवर्षीपेक्षा २० हजार टन साखरेचे जादा उत्पादन घेतले आहे. साखर उतारा ११.९० टक्केवरुन १२.३५ टक्केपर्यंत वाढविल्यामुळेच उदगिरीचे उत्पादन जादा झाले आहे. उर्वरित कारखान्यांचे गतवर्षीपेक्षा गाळप आणि साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. उत्पादन कमी असूनही लॉकडाऊनमुळे साखर खरेदीसाठी व्यापारी बाहेर पडत नसल्यामुळे कारखानदार चिंतेत आहेत. शेवटच्या महिन्यात गाळपास गेलेल्या उसाचे बिलही शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

Web Title: In Sangli district, sugar production declined by 17.25 lakh quintals