परतीचा पाऊस अन् धुक्याने द्राक्षबागांना बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 18:23 IST2019-11-11T18:22:08+5:302019-11-11T18:23:06+5:30
मोठे बागायतदार ट्रॅक्टरने औषध फवारणी करतात, तर लहान बायायतदार मजूर सांगून औषध फवारणी करतात. त्यामुळे एकरी बागेच्या उत्पादनासाठी जवळपास एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पण आता रोगामुळे ज्यांच्या बागा वाया गेल्या आहेत,

परतीचा पाऊस अन् धुक्याने द्राक्षबागांना बसला फटका
म्हैसाळ-मिरज : मिरज पूर्व भागातील परतीच्या पावसाने व पहाटेच्यावेळी पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्षबागायतदारांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेक बागायतदारांनी द्राक्षबागा सोडून दिल्या आहेत, तर काही बागायतदारांनी द्राक्षबागा तोडून टाकायला सुरुवात केली आहे.
मिरज पूर्व भागात म्हैसाळ, नरवाड, आरग, बेडग, मालगाव, लिंगनूर, बेळंकी या भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्षबागा आहेत. परिसरातील अनेक द्राक्ष बागातदारांनी यापूर्वी द्राक्षांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
यंदा परतीच्या पावसामुळे यावेळी चांगल्या आलेल्या पिकावर दावण्या, कूज, करप्या यासारख्या रोगांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसातून दोन ते तीनवेळा औषध फवारणी करूनही रोग नियंत्रणात येत नाहीत. त्यामुळे शेतकरी हताश आहे. दिवसाकाठी औषधाला एकरी दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. मोठे बागायतदार ट्रॅक्टरने औषध फवारणी करतात, तर लहान बायायतदार मजूर सांगून औषध फवारणी करतात. त्यामुळे एकरी बागेच्या उत्पादनासाठी जवळपास एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पण आता रोगामुळे ज्यांच्या बागा वाया गेल्या आहेत, यंदाचा खर्च पाण्यात गेला असून पुढीलवर्षीचा उत्पादन खर्च वेगळा, अशी स्थिती आहे. त्यातच काही द्राक्ष बागायतदारांनी बागेच्या जिवावर बांधकाम, मुलांचे शिक्षण, शेती अवजारे खरेदी करण्यासाठी कर्जे काढलेली आहेत. त्यामुळे हे कर्ज कसे फेडायचे? औषध दुकानाची बाकी कशी फेडायची? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागले आहेत.