दिल्ली आंदोलनाबाबत जयंतरावांकडून हिंसेचे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:17+5:302021-02-05T07:27:17+5:30
इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे चालले आहे, त्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील हिंसेचे समर्थन करत ...

दिल्ली आंदोलनाबाबत जयंतरावांकडून हिंसेचे समर्थन
इस्लामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे चालले आहे, त्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील हिंसेचे समर्थन करत आहेत. भाजप सरकारवर आरोप करून लोकांना भडकवले जात आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.
येथे भाजप आणि रयत क्रांती आघाडीच्या असंघटित बांधकाम कामगार मेळाव्यासाठी ते आले होते. मेळावा झाल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सामान्य नागरिकही हिंसेचे समर्थन करणार नाही. मात्र मंत्री असूनही जयंत पाटील हिंसेचे समर्थन करतात. आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याच्या कथा रचल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली हिंसेवर विश्वास असणारे लोक या आंदोलनात उतरले आहेत. त्याचमुळे हिंसाचार झाला. संपूर्ण जगाने ही घटना माध्यमातून पाहिली आहे.
ते म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकरी आंदोलकांशी नऊवेळा चर्चा केली. त्यातून खूप गोष्टी मान्य झाल्या होत्या. केंद्राने कृषी कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याची तयारी दाखवत समिती नेमून यावर मार्ग काढू अशी भूमिका घेतली होती. यापेक्षा आणखी काय करायला हवे होते? हिंसेचे समर्थन न करता आंदोलने झाली पाहिजेत.
पाटील म्हणाले की, कोरोनाच्या काळात भीतीमुळे घरी बंदिस्त राहिलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता प्रासंगिक बाहेर दिसू लागले आहेत. मराठा आरक्षण, इतर मागास प्रवर्ग आणि इतर बरेच प्रश्न आहेत. मात्र मंत्र्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. कोरोनाकाळात शेतकरी, कामगार किंवा ज्यांना आवश्यकता आहे, अशा घटकांना राज्य सरकारची कसलीही मदत मिळाली नाही. हे सर्व घटक रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही.