‘हुतात्मा’ची पहिली उचल २२२० रुपये
By Admin | Updated: December 20, 2015 00:33 IST2015-12-20T00:33:59+5:302015-12-20T00:33:59+5:30
वैभव नायकवडी : राज्यात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम

‘हुतात्मा’ची पहिली उचल २२२० रुपये
वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यातर्फे २०१५-१६ या गळीत हंगामासाठी उच्चांकी २२२० रुपये पहिली उचल जाहीर करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी शनिवारी याबाबतची घोषणा पत्रकार परिषदेत केली. दोन दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. हुतात्माने जाहीर केलेली पहिली उचल राज्यात उच्चांकी असल्याचे मानले जात आहे.
नायकवडी म्हणाले की, हुतात्मा कारखान्याचा चालू गळीत हंगाम सुरू करीत असताना, महाराष्ट्राचा आर्थिक कणा असलेला साखर उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. साखरेला दर नाही. जागतिक बाजारात साखरेचे दर उतरलेले आहेत. साखर उत्पादन खर्च वाढलेला आहे. अपेक्षित उसाचे गाळप यावर्षी होईल किंवा नाही हा प्रश्न आहे. याचा विचार करता शेतकऱ्यांना परवडेल, असा दर देता येत नाही. तरीसुद्धा क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक धोरणांनुसार शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, ऊसतोडणी, वाहतूक, कंत्राटदार यांच्या हिताच्या दृष्टीने हुतात्मा परंपरेप्रमाणे उसाला उच्चांकी २२२० रुपये पहिली उचल जाहीर करीत आहे.
गतवर्षी प्रती टन २६३९ रुपये दर देऊन कारखान्याने देशात प्रथम क्रमांकाचा मान मिळविला होता. हुतात्मा साखर कारखाना केवळ साखर या एकमेव उत्पादनावर १९८४ पासून आजअखेर उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा जपत आहे.
या हंगामात कारखान्याने १८ डिसेंबरअखेर दोन लाख सात हजार ३५० टन उसाचे गाळप केले असून, सरासरी साखर उतारा ११.७८ टक्के मिळाला आहे. दोन लाख ४१ हजार ९२५ क्विंटल साखरपोती उत्पादन झाले आहे. हुतात्मा पॅटर्नमुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात प्रगतीसाठी मोलाची भर पडली आहे. आजअखेर शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे व कारखान्यांचे नुकसान होत आहे. अशावेळी ‘हुतात्मा’ने पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी अनेकवेळा फोडली आहे.
त्यामागे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा यांचा विचार ही मोठी शक्ती आहे. कारखान्याने सभासदांना प्रती महिना तीन रुपये दराने १५ किलो साखर, दोन रुपयांनी प्रती
मे. टन प्रेसमड बांधपोहोच करून ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले आहेत.
यावेळी उपाध्यक्षा वंदना माने, संचालक शंकर खोत, बाजीराव मोहिते, सुरेश होरे, तुकाराम कदम, पोपट जाधव, शिवाजी पाटील, आनंदा पाटील, बी. टी. घारे,
सुनील रकटे, एकनाथ वाघमारे, बाळासाहेब तांदळे, कोंडिबा मस्के, सुरेश कुंभार, सुनीता माळी, कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, चीफ अकौंटंट बी. डी. आव्हाड उपस्थित होते.
(वार्ताहर)