सांगली : महापालिका क्षेत्रातील फेरीवाले, भाजी व फळविकेत्यांवर केल्या जात असलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर व आयुक्त सत्यम गांधी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. ‘गरिबांवर हातोडा कशाला चालवताय, बड्यांची अतिक्रमणे आधी काढा,’ अशी भूमिका पडळकर यांनी मांडली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोघांत मध्यस्थी केल्यानंतर वाद शमला.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभा झाली. या सभेत महापालिका क्षेत्रात सध्या रस्त्यावरील विविध अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू आहे. आमदार पडळकरांनी तो मुद्दा उपस्थित केला. ‘महापालिका क्षेत्रात अद्याप फेरीवाल्यांचा झोन निश्चित झालेला नाही. फेरीवाला धोरण ठरलेले नाही. त्यांनी कुठे व्यवसाय करावा, हे तुम्ही सांगत नाही, मग कारवाई का करता? फेरीवाले वाहतुकीला अडथळा ठरू नयेत, हे मान्य आहे मात्र त्यांना जागा देण्याची जबाबदारी महापालिकेची नाही का? पाऊस सुरू आहे. सण-उत्सवांचा काळ आहे. अशावेळी बुलडोझर लावून त्यांच्या गाड्या मोडता, हे शोभत नाही,’ अशा शब्दांत पडळकरांनी महापालिका आयुक्त गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.आयुक्त गांधी यांनी, ‘ज्यांचे अतिक्रमण आहे, ते कायदेशीर मार्गाने काढत आहोत. हे करताना कुणी अडथळा आणला तर गाडा मोडल्यास आम्ही जबाबदार नाही,’ अशी भूमिका मांडली. याच मुद्द्यावर जोरदार खडाजंगी झाली. ‘आयुक्तांची दादागिरी सुरू आहे. ती कदापि खपवून घेणार नाही,’ अशा शब्दांत पडळकरांनी हल्ला चढवला. ‘आधी या गरिबांना जागा द्या, तेथे सोयी करून द्या, त्यानंतर कुणी अतिक्रमण केले तर कारवाई करा, तोवर कारवाई करणार असाल तर रस्त्यावर उतरावे लागेल,’ अशा शब्दांत पडळकर यांनी आयुक्त गांधी यांना इशारा दिला.
‘पडळकर अभ्यासू; पण खूप आक्रमक’पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच भांडणाचा विषय पत्रकार परिषदेत काढला. आमदार गोपीचंद पडळकर आणि आयुक्त गांधी यांच्यात केवळ मारामारी व्हायची बाकी होती, अशा शब्दांत त्यांनी या ‘बंद दाराआड’च्या गोंधळाचे वर्णन केले. ‘पडळकर अभ्यासू आहेत, पुरावे असल्याशिवाय बोलत नाहीत. मात्र त्यांनी आपली भूमिका संयमपणे मांडायला हवी,’ अशी अपेक्षाही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.