अशोक डोंबाळेसांगली : सांगली जिल्हा हा कधीकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. पण, या बालेकिल्ल्याला भाजपने शिरकाव केल्यापासून पडझडीचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. आता तर राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनाच भाजपमध्ये घेऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पण, या धक्क्यानंतर ही काँग्रेस नेत्यांना जाग आल्याचे दिसत नाही. काँग्रेस नेत्यांनी असेच मौन धारण केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा इतिहास खूप जुना आहे आणि जिल्ह्याच्या राजकीय जीवनात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्याला एक स्वतंत्र संस्थानाचा इतिहास आहे आणि स्वातंत्र्यानंतर या जिल्ह्याची राजकीय वाटचाल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल वसंतदादा पाटील होते. वसंतदादा आणि त्यानंतरही अनेक दिवस सांगली जिल्ह्यातून राज्यातील काँग्रेसच्या घडामोडी होत होत्या. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समित्या आणि महापालिका या संस्थांवर ही काँग्रेस आघाडीचे वर्चस्व होते. पण, गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात काँग्रेसची पडझड सुरु झाल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली. पक्षाची बांधणी करण्याकडे नेत्यांकडून दुर्लक्ष होत गेले. यातूनच जिल्ह्यात दिवसेंदिवस काँग्रेसचा टक्का घसरत आहे. यात भरीस भर म्हणून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसला रामराम करुन भाजपचे कमळ हाती घेतले. महापालिका क्षेत्रात दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांचा गट मोठा आहे. जयश्रीताईंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिका क्षेत्रात काँग्रेसला मोठा फटका बसला आहेच. उलट भाजपला एक हाती सत्ता मिळण्याची संधी आहे. काँग्रेसचे सहयोग खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते व पलूस-कडेगाव आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्याकडून काँग्रेसची गळीत रोखण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काँग्रेस नेत्यांनी असेच दुर्लक्ष केल्यास आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व काय असेल, हे सांगायला भविष्य व्यत्ययाची गरज नाही.
काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी डॉ. विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी मनापासून प्रयत्न केल्यास जिल्ह्यात वेगळं चित्र दिसेल. पण, या दोन्ही नेत्यांकडून पक्ष बांधणीला प्राधान्य दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून होताना दिसत आहे. तरुण नेतृत्व असूनही ते काँग्रेसच्या गडाची पडझड रोखण्यात अपयशी ठरत असल्याचेही दिसत आहे.