सांगली, शिराळ्यात कॉँग्रेसची निदर्शने
By Admin | Updated: December 20, 2015 00:31 IST2015-12-20T00:31:45+5:302015-12-20T00:31:45+5:30
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : भाजप सरकारने षड्यंत्र रचल्याचा आरोप

सांगली, शिराळ्यात कॉँग्रेसची निदर्शने
सांगली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांची बदनामी करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्हा व शहर जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस भवनपासून स्टेशन चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, शिराळ्यात कॉँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले, भाजपने कॉँग्रेसविरोधात षड्यंत्र रचले असून, त्याचा निषेध करण्यासाठीच या मोर्चाचे आयोजन केले आहे. कॉँग्रेसचे सर्व कार्यकर्ते गांधी घराण्याच्या पाठीशी आहे. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजपकडून जाणीवपूर्वक कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी व विरोधी पक्षातील नेत्यांना सीबीआयच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम सुरु आहे. आपले अपयश लपवून ठेवण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले, भाजपला विरोधी पक्षच नको असल्याने त्यांनी विरोधी पक्षांची बदनामी सुरु केली आहे. यावेळी माजी आमदार हाफिज धत्तुरे, उमाजीराव सनमडीकर, विक्रम सावंत, आनंदराव मोहिते, इंद्रजित साळुंखे, सुभाष खोत, राजीव मोरे, दिलीप पाटील, रफिक मुजावर, अजित ढोले, राजन पिराळे, अजित दुधाळ, सतीश पाटील, सी. बी. पाटील, दिलीप बुरसे, मृणाल पाटील, बाळासाहेब गुरव, रावसाहेब माणकापुरे आदी सहभागी झाले होते.
सागाव : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेसला नाहक बदनाम केले जात आहे. हे षड्यंत्र मोदी सरकारने रचले असून, काँग्रेस पक्षाला बदनाम करणाऱ्या भाजप वृत्तीचा निषेध व भाजपविरोधात निदर्शने शिराळा तालुका काँग्रेसच्यावतीने शनिवारी करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर हल्ला करण्याचा प्रयत्न भाजपप्रणित मोदी सरकारने सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाविरोधात सुडबुध्दीचे आरोप करून काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व युवा नेते राहुल गांधी यांना टार्गेट केले जात आहे. तसेच अन्य काँगे्रस नेत्यांनाही यामध्ये लक्ष्य केले आहे. या प्रवृत्तीचा निषेध करावा तितका थोडा आहे.
तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाला त्यागाची, बलिदानाची परंपरा असताना, भाजपसारखा जातीयवादी पक्ष लोकांमध्ये गैरसमज निर्माण करुन बदनाम करत आहे. यावेळी संपतराव देशमुख, के. डी. पाटील, तानाजी जाधव, सत्यजित पटील, दादा नलवडे आदी अपस्थित होते. (वार्ताहर)