कोरोनाचे संकट अद्यापही गडदच, नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास मिळालेली शिथिलता रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:04 IST2020-05-06T12:00:49+5:302020-05-06T12:04:33+5:30
त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पाळण्याच्या अनिवार्य अटींवर काहीशा प्रमाणात मिळालेली ही सूट देखील आपण गमावून बसू व त्याचा फटका संपूर्ण जिल्हावासीयांना बसेल, अशी स्पष्टता जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

कोरोनाचे संकट अद्यापही गडदच, नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास मिळालेली शिथिलता रद्द
सांगली : केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाने सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्याने काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तथापि अद्यापही कोरोनाचे संकट गंभीर आहे, याचे भान ठेवून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. पण काही प्रमाणात शिथिलता मिळताच लोकांनी लॉकडाऊन संपल्याचा गैरसमज करून घेऊन ज्या पद्धतीने रस्त्यावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे, त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढून जिल्हा ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये जाण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पाळण्याच्या अनिवार्य अटींवर काहीशा प्रमाणात मिळालेली ही सूट देखील आपण गमावून बसू व त्याचा फटका संपूर्ण जिल्हावासीयांना बसेल, अशी स्पष्टता जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
दिनांक ४ मे पासून राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक
सूचनांनुसार काही बाबींमध्ये सूट दिली आहे. तथापि बाजार, रस्ते, दुकाने या ठिकाणी लोकांची गर्दी प्रचंड मोठ्या
प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. सदरची बाब निश्चितच धोकादायक असून लोकांनी स्वयंशिस्त न
पाळल्यास तसेच अनावश्यक घराबाहेर पडणे बंद न केल्यास कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक
काटेकोरपणे करण्यासाठी ही सूट काढून घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.
मद्यविक्री दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर लागलेल्या रांगा व झालेली गर्दी निदर्शनास येत आहे. गर्दीच्या
नियमनासाठी दुकानदारांनी ग्राहकांना उभे राहण्यासाठी मार्किंग करावे व त्यामध्ये किमान सहा फुटाचे अंतर
असावे.
ग्राहकांना त्यांच्या ऑर्डर देण्यासाठी एक मागणी पत्राचा नमुना द्यावा. त्या नमुन्यामध्ये अनुक्रमांक,
ग्राहकाचे नाव, ग्राहकाचा मोबाईल नंबर व मद्याची मागणी यांचा समावेश असावा. ग्राहकांना सदर मागणी पत्राचा
नमुना दिल्यानंतर दुकानदारांनी त्यांना टोकन क्रमांक द्यावा. जर टोकन उपलब्ध नसतील तर कोऱ्या कागदावर
दुकानदाराने स्वतःच्या दुकानाचा शिक्का व दूरध्वनी क्रमांक देऊन त्यावर अनुक्रमांक लिहावा. तो अनुक्रमांक
ग्राहकाला दिलेल्या अनुक्रमांकाचा असावा. साधारणपणे अशा 50 ग्राहकांना सेवा एका तासात दिली जाऊ शकते.
तद्नंतर दुसऱ्या तासात 51 ते 100 क्रमांक अशा पद्धतीने विक्री व्हावी व गर्दीचे नियंत्रण व्हावे.
आठ तासात जास्तीत जास्त चारशे लोकांना सेवा दिली जाऊ शकते. त्यामुळे चारशेच्या पुढे येणाऱ्या ग्राहकांना दुसऱ्या दिवशी सेवा देण्यात येईल, हे स्पष्टपणे सांगावे. दुकानदाराने दर पंधरा मिनिटानंतर अथवा आवश्यकतेनुसार कोणत्या ग्राहकाचा टोकन क्रमांकाची सर्विस चालू आहे ते बोर्डवर नमूद करावे. ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी दुकानदारांनी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. उत्पादन शुल्क विभागातील जवान सहाय्यक दुय्यम निरीक्षक यांनासुद्धा सोशल डिस्टन्सिंग व गर्दीचे नियंत्रण करण्याकरिता नेमणूक करावी. विभागातील निरीक्षक, दुय्यमनिरीक्षक यांना झोनल ऑफिसर म्हणून विशिष्ट भागासाठी तात्काळ नियुक्त करावे, व भरारी पथक नेमून या भरारीपथकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते किंवा कसे याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. कोणत्याहीपरिस्थितीत दुकानासमोर उभ्या असणाऱ्या ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे .
या सर्व नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास मद्यविक्रीसाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात येईल.
तसेच ज्या प्रत्येक आस्थापनांना चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे अशांनी सोशल डिस्टन्सिंगचे, नियमांचे
काटेकोर पालन न केल्यास त्यांचीही परवानगी रद्द करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी
स्पष्ट केले आहे.