मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद जयंतरावांकडे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 04:12 PM2020-01-02T16:12:27+5:302020-01-02T16:14:19+5:30

सांगली : राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याच्या वाट्याला आता दोन मंत्रिपदे आली आहेत. त्यामुळे पालक मंत्री कोण होणार, ...

After the expansion of the Cabinet, the Guardian Minister Jayantrao | मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद जयंतरावांकडे शक्य

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद जयंतरावांकडे शक्य

Next
ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद जयंतरावांकडे शक्य राज्यमंत्री विश्वजित कदमही पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत

सांगली : राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याच्या वाट्याला आता दोन मंत्रिपदे आली आहेत. त्यामुळे पालकमंत्री कोण होणार, याविषयीची चर्चा रंगली आहे. अर्थमंत्रीजयंत पाटील यांच्याकडेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येण्याची दाट शक्यता आहे. राज्यमंत्री विश्वजित कदमही पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

भाजपच्या सत्ताकाळात सांगलीचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख या जिल्ह्याबाहेरील नेत्यांकडे होते. त्यापूर्वी पंधरा वर्षे आघाडी सरकारच्या काळात सांगलीचे पालकमंत्रीपद डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे होते. जिल्ह्यातील नेत्याकडेच पालकमंत्रीपद असण्याची परंपरा सांगलीत दीर्घकाळ राहिली; मात्र भाजपच्या सत्तकाळात यात खंड पडला. बाहेरील नेत्यांकडे पालकमंत्रीपद दिल्यामुळे जिल्ह्यास त्यांचा फारसा फायदा होत नसल्याची टीकाही होत होती. कार्यकर्त्यांसह नागरिकांतूनही नाराजी होती.

महापुराच्या काळात तत्कालीन पालकमंत्री सुभाष देशमुख जिल्ह्यात फिरकले नसल्याने त्यांना जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. राज्यात आता महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. जिल्ह्याला जयंत पाटील यांच्या माध्यमातून एकच कॅबिनेट मंत्रीपद लाभले आहे. विश्वजित कदम राज्यमंत्री आहेत.

सर्वात ज्येष्ठ नेत्याकडे पालकमंत्रीपद असावे, असा आजवरचा राजकीय संकेत असल्याने आघाडीच्या काळात पतंगराव कदम यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. त्यावेळी जयंत पाटील व माजी मंत्री आर. आर. पाटील यांनीही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला नव्हता. आता जिल्ह्यात ज्येष्ठ नेते म्हणून जयंत पाटील यांच्याकडेच पाहिले जाते. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी विश्वजित कदम यांच्यापेक्षा पाटील यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे.

पाटील यांच्याकडे अन्य जिल्ह्याची जबाबदारी सोपविली गेल्यास दुसरा पर्याय म्हणून विश्वजित कदम यांना संधी मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हाती आहे. जयंत पाटील यांनी यापूर्वी मुंबईचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे.

त्यामुळे त्यांना अन्य कोणत्या तरी मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र जिल्ह्यात सध्या आघाडीची स्थिती मजबूत असून, ती आणखी मजबूत करण्यासाठी अनुभवी नेता म्हणून पाटील यांना पालकमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: After the expansion of the Cabinet, the Guardian Minister Jayantrao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.