सांगलीत उद्योजकांकडून २००० कोटींची गुंतवणूक, ४ हजार ४८९ जणांना मिळणार रोजगाराची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:03 IST2025-04-10T14:02:02+5:302025-04-10T14:03:00+5:30
उद्योग संचालनालयासोबत सामंजस्य करार

सांगलीत उद्योजकांकडून २००० कोटींची गुंतवणूक, ४ हजार ४८९ जणांना मिळणार रोजगाराची संधी
प्रसाद माळी
सांगली : राज्यातील उद्योग संचालनालयाकडून राज्य तसेच विविध जिल्ह्यांत उद्योगवाढीसाठी व रोजगार निमिर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत सांगली जिल्हास्तरीय गुतंवणूक परिषद १२ एप्रिलला होणार आहे. सांगलीतील या गुंतवणूक परिषदेमध्ये १४७ उद्योजकांशी सामंजस्य करार होणार आहेत. त्यामध्ये सांगलीत तब्बल दोन हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४ हजार ४८९ रोजगार निर्मिती होणार आहे.
उद्योग संचालनालयाचे पुणे विभागीय कार्यालय आणि सांगली जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे ‘जिल्ह्यास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५’ होणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, विभागीय उद्योग सहसंचालक एस. जी. राजपूत हे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत १४७ उद्योजकांशी उद्योग संचालनालय सामजंस्य करार करणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली.
गुंतवणूक परिषदेचे उद्देश
- गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करणे.
- राज्यातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करणे.
- जिल्ह्याच्या विकासाला चालना देणे.
- राेजगाराच्या संधी निर्माण करणे.
असे होणार प्रमुख सामंजस्य करार..
उद्योगाचे नाव गुंतवणूक (कोटी)
साईचैन इंडस्ट्री - २९
पी. जी. इंडस्ट्री - २८.९
द सुप्रिम इंडस्ट्री - ४००
शाह लागू प्रापर्टी - ६२.३
जी. आर. मोहिते प्रा. लि. - ५१.५०
सामजस्य करारातून जिल्ह्यातील उद्योजकांना शासनाकडून जमीन, वीज, पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यांची तातडीने पूर्तता करून उद्याेगास चालना दिली जाणार आहे. टेक्सटाइल, प्लॅस्टिक, शेतीपूरक उद्योगांसह विविध क्षेत्रांत गुंतवणूक होणार आहे. यामध्ये २० टक्के महिला उद्योजकांचा समावेश असणार आहे. - विद्या कुलकर्णी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सांगली.