शहरे नव्हे, उपनगरांमध्ये घरे वेगाने होताहेत महाग; अनेक मोठे गृहप्रकल्प आणि कनेक्टिव्हिटीच्या उत्तम सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:09 IST2024-12-12T08:09:13+5:302024-12-12T08:09:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट बाजार सध्या तेजीत आहे. विशेष म्हणजे प्रमुख शहरांच्या तुलनेत त्यांच्या ...

शहरे नव्हे, उपनगरांमध्ये घरे वेगाने होताहेत महाग; अनेक मोठे गृहप्रकल्प आणि कनेक्टिव्हिटीच्या उत्तम सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट बाजार सध्या तेजीत आहे. विशेष म्हणजे प्रमुख शहरांच्या तुलनेत त्यांच्या लगतचा परिसर, तसेच जवळच्या उपनगरांमध्ये घरांच्या किमती वेगाने वाढत आहेत. हा बदल प्रामुख्याने मागील ६ वर्षांत झालेला आहे. रिसर्च फर्म ॲनारॉकने सात शहरांच्या केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे.
ॲनारॉक गुपचे उपाध्यक्ष संतोष कुमार म्हणाले की, मागील सहा वर्षांत शहरांच्या तुलनेत लागून असलेल्या परिसरात चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणाऱ्या सुविधा मिळाल्या आहेत. लोकांसाठी चांगले राहणीमान हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरू लागला आहे. त्यामुळे बिल्डरांनी शहरांना लागून असलेल्या परिसरात मोठमोठे गृहप्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. आता आलिशान प्रकल्पांसाठी लागणारी मोठी जागा इथे सहजपणे उपलब्ध होत आहे.
कोलकाता शहराजवळ असलेल्या जोकामध्ये घरांच्या किमती मागील सहा वर्षात ५१ टक्के वाढल्या आहेत तर चेन्नईलगत असलेल्या नवलूरमध्ये किमती ५४ टक्के वाढल्या आहेत.
पनवेल, विरार ५८% महाग
nमुंबई महानगर क्षेत्राचा विचार केला तर पनवेलमधील जागांच्या किमती सहा वर्षांत ५८ टक्के वाढल्या आहेत. २०१९ मध्ये ५,५२० रुपये प्रतिचौरस फूट असलेले दर २०२४ मध्ये ८,७०० रुपयांवर पोहोचले आहेत.
nविरारमध्येही किमती ५८ टक्के वाढल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी
४,४४० रुपये प्रतिचौरस फूट इतके असलेले दर आता ६,८५० रुपयांवर पोहोचले आहेत.
वाकड २७%; वाघोली ३७% महाग
nपुण्याजवळ असलेल्या वाकडच्या घरांच्या किमती २७ टक्के वाढल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी ६,५३० रुपये प्रतिचौरस फूट इतके असलेले दर आता ८,३०० रुपयांवर पोहोचल्याचे दिसून आले आहे.
nवाघोलीतील घरे सहा वर्षांत ३७ टक्के महाग झाली आहेत. २०१९ मध्ये ४,८२० रुपये प्रतिचौरस फूट असलेले दर २०२४ मध्ये ६,६०० रुपयांवर पोहोचले आहेत.
बंगळुरूजवळचे गुंजूर ६९% महाग
बंगळुरुलगत असलेल्या गुंजूरमध्ये घरांच्या किमती तब्बल ६९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. २०१९ मध्ये ५,०३० रुपये प्रतिचौरस फूट असलेले दर २०२४ मध्ये वाढून ८,५०० रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच थन्नीसांद्रा परिसरातील दरही ६२ टक्के वाढले आहेत. सहा वर्षांपूर्वी ५,१७५ रुपये प्रतिचौरस फुटांवर असलेले दर आता ८,४०० रुपयांवर पोहोचले आहेत.