रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ एक तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली. ही तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात पडली की तिने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. रविवार २९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता घडलेल्या या प्रकारानंतर सायंकाळी उशिरापर्यंत तिला शोधण्याचे सर्वच प्रयत्न अयशस्वी झाले. ती कोण आहे, याचा उलगडाही सायंकाळी उशिरापर्यंत झालेला नव्हता.सुटीच्या दिवशी भगवती किल्ल्याजवळ असलेली शिवसूष्टी पाहण्यासाठी स्थानिक लोकांसह बाहेरील पर्यटकांचीही मोठी गर्दी दिवसभर असते. रविवारी २९ जून रोजीही दुपारी येथे पर्यटकांची गर्दी होती. त्यावेळी २३ ते २५ वर्षीय तरुणी पाण-भुयार स्पॉटजवळ असलेल्या रेलिंगच्या पुढे जाऊन सेल्फी काढण्यात गुंग होती. सेल्फी काढताना तिने आपले चप्पल आणि स्कार्फ बाजूला काढून ठेवले होते. आजुबाजुला अन्य काही पर्यटकही निसर्गाचा आनंद लुटत असताना अचानक ती तरुणी अचानक सुमारे २०० ते २५० फूट खोल समुद्राच्या पाण्यात पडलेली दिसली.आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरडा करताच त्या ठिकाणी एकच गर्दी झाली. काहींनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तत्पूर्वी ती तरुणी खवळलेल्या समुद्रात दिसेनाशी झाली.दरम्यान, या तरुणीचा शोध घेण्यासाठी रत्नदुर्ग माऊंटेनियर्स आणि एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. परंतु सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र यामुळे त्या तरुणीचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
धोकादायक ठिकाणी जाणे टाळारत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना भविष्यात अशाप्रकारच्या घटना त्याठिकाणी घडू नयेत यासाठी काही उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
सोबत कोणीच नव्हते?ही तरुणी खाली पडल्यानंतर कोणीही तिच्याबाबत माहिती देण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे ती तेथे एकटीच आली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ती एकटीच आली होती तर तिने आत्महत्या केली आहे का, असा प्रश्नही केला जात आहे.