शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:19 AM2019-04-08T11:19:25+5:302019-04-08T11:21:52+5:30

शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला दीड वर्ष झाले तरी प्रक्रिया मात्र अद्यापही रेंगाळली आहे.  याचिकांचे कारण शिक्षण विभागाकडून दिले जात असले तरी पोर्टलचा हा खेळ केव्हा संपणार असा सवाल

Waiting for candidates for recruitment of teachers | शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची प्रतिक्षा

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची प्रतिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देत्यामुळे सध्यातरी  उमेदवारांना शिक्षक भरतीबाबत प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला दीड वर्ष झाले तरी प्रक्रिया मात्र अद्यापही रेंगाळली आहे.  याचिकांचे कारण शिक्षण विभागाकडून दिले जात असले तरी पोर्टलचा हा खेळ केव्हा संपणार असा सवाल उमेदवारांमधून करण्यात येत आहे.

शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित आले.  पवित्र पोर्टलवर राज्यभरातून एक लाख २३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी १२ हजार शिक्षकांची भरती करण्यासाठी पोर्टलवर जाहिराती प्रसिध्द केल्या. उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणालीही तयार करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात प्रक्रिया केव्हा सुरू होणार याचीच उमेदवारांना प्रतिक्षा आहे.

शिक्षक भरतीकरिता राज्यातील १४ खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय एक हजार २४१ शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शविला आहे. यामुळे मुलाखत प्रक्रियेतून उमेदवारांची सुटका होण्यातील मार्ग सुरळित झाला आहे. पवित्र प्रणालीद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार, पात्रतेनुसार निवडक शाळांची यादी पोर्टलवर पाहता येणार आहे. या यादीतील पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम उमेदवारांना नोंदविण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी मेरीटनुसार थेट शिक्षकांची निवड केली जाणार आहेत. मात्र खासगी शैक्षणिक संस्थांना उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शिक्षक निवड करण्याचे अधिकार दिले आहेत. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलाविण्याची नियमावलीही तयार केली आहे. मुलाखत व वर्गात शिकविण्याच्या प्रक्रियेचे व्हीडिओ शुटिंग करण्याची अट देखील घालण्यात आली आहे. मात्र मुलाखत घेण्याची प्रक्रिया वेळकाढू आहे. शिवाय  मुलाखत निवडीवरून पुन्हा शंका उपस्थित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी खासगी शैक्षणिक संस्थांना मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्याबाबत विनंती केली होती. संस्थांनी विनंती मान्य करून प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र प्रक्रिया प्रत्यक्षात लांबली आहे.

उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार आहे. मात्र इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी २० टक्के राखीव जागा मिळाव्यात, बीएड् अर्हता धारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट या विषयांवर औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. २० टक्के राखीव जागा विषयावरील याचिकेबाबत अंतरिम आदेश झाले आहेत. मात्र अंतिम आदेशानंतर स्पष्टता येणार आहे, त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली होणार आहे. मार्गदर्शक सूचना पुढील आठवड्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्यातरी  उमेदवारांना शिक्षक भरतीबाबत प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

Web Title: Waiting for candidates for recruitment of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.