रत्नागिरी : आमच्यातील वाद हे महाराष्ट्रापेक्षा छोटे आहेत, असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पण, समाेरच्यांकडून कशा पद्धतीने ते कमी लेखण्यात आले हे दिसले आणि उद्धव ठाकरे यांचे उत्तर म्हणजे शाळेतील भांडणासारखे असल्याचे भाष्य राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना केले.रत्नागिरी दाैऱ्यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी मुलाखतीत महाराष्ट्र आपल्या सगळ्यांपेक्षा माेठा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची भांडणं महाराष्ट्रापेक्षा छाेटी आहेत, असेही त्यांनी सांगितले. पण, त्याची लिंक कशी जाेडली गेली, का जाेडली गेली, कशामुळे जाेडली गेली, हे माहीत नाही. राज ठाकरे सकारात्मक बाेलले असतील, पण समाेरून अटी, शर्तींवर ते आमच्यासाेबत आले पाहिजेत, भाजपबराेबर त्यांनी बाेलता कामा नये, असे सांगण्यात आले. हे प्राथमिक शाळेतील भांडणासारखे राजकारणात सुरू झाले आहे. त्याचा विचार करण्याएवढे राज ठाकरे नक्कीच माेठे आहेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे उत्तर शाळेतील भांडणासारखे : उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:13 IST