चिपळूण : चिपळूण मतदारसंघात ज्यावेळी राष्ट्रवादीचे पहिले आमदार निवडून आले, तेव्हा माझ्याविरोधात कोणी काम केले, हे समोर आहे. शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते. विरोधकांपेक्षा पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणारा हाच शत्रू असतो आणि तेच धोकादायक ठरत आहे, असे रोखठोक विधान उद्धवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले.शहरातील बांदल सभागृहात उद्धवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यात अपेक्षेप्रमाणे आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्याना उमेदवारी नको होती, पक्षाचा आमदार हवा होता. मात्र, चिपळूणमध्ये आपल्याविरोधात बैठका सुरू होत्या. आता कित्येक वर्षे वाट पाहावी लागणार आहे.मेळाव्यात उपनेते बाळ माने, सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख बाळाराम खेडेकर, दत्ता कदम, जिल्हा संघटक संतोष थेराडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अरुणा आंबे, विभाग प्रमुख सचिन शेट्ये, बाळा कदम, तालुकाप्रमुख पप्या चव्हाण, युवासेनेचे विक्रांत जाधव, भय्या कदम उपस्थित होते.
चिपळूणची जागा घालवली कोणी?
- उद्धवसेनेला चिपळूणची जागा परत मिळावी अशी मागणी आता केली जात आहे; पण आधीच्या निवडणुकीत उद्धवसेनेला मिळत असलेली जागा घालवली कोणी, असा प्रश्न आमदार जाधव यांनी केला.
- संतोष थेराडे, प्रताप शिंदे, बाळा कदम, विनोद झगडे, तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. चिपळूणची जागा कोणामुळे गेली, तुम्ही ही जागा घालवलीत, असा थेट हल्लाही त्यांनी यावेळी केला.
- शरद पवार यांनी ही जागा उद्धवसेनेला दिली होती. मीच त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार बैठक लावून मी प्रयत्नही सुरू केले होते. मात्र, मला जागा मिळू नये म्हणून विरोध सुरू झाला, बैठका सुरू झाल्या. काहींनी तर दुकानेच थाटली. शेवटी घडायचे तेच घडले. आता कित्येक वर्षे येथे उद्धवसेनेचा आमदार होण्याची वाट बघत बसा, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांचे कान टोचलेआज पक्षाची स्थिती वाईट आहे. कोणी निघून गेला की काहीच फरक पडत नाही, हे वारंवार सांगितले जाते. मात्र, परिस्थिती तशी नाही. जाणारा कार्यकर्ता आपणच मोठा केलेला असतो. त्याचे कर्तृत्व पाहूनच त्याला पद दिलेले असते. त्यामुळे नेहमी फरक पडत नाही, असे म्हणण्यापेक्षा कोणी गेले तरी फरक पडू देणार नाही, असा निर्धार करून पुढे जाऊया आणि जुन्यांना घेऊन पूर्वीचे वैभव प्राप्त करूया, अशा शब्दांत आमदार जाधव यांनी कान टोचले.