अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड, उमेदवारांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 18:03 IST2020-12-28T17:58:29+5:302020-12-28T18:03:36+5:30
Grampanchyat Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, तीन दिवस सुट्टया आल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड, उमेदवारांची धावपळ
रत्नागिरी : जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, तीन दिवस सुट्टया आल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे.
जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी कार्यरत असली तरीही अद्याप स्थानिक पातळीवर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस या पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यातच आता भाजपसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, २५ डिसेंबर रोजी आलेली नाताळची सुट्टी त्याला जोडून आलेला शनिवार, रविवार यामुळे उमेदवारांना अर्ज दाखल करता आलेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने गर्दी उडाली आहे. सुट्टीत ऑनलाईन सेवा देणारी केंद्र सुरू ठेवल्याने इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. सोमवारपासून तहसील कार्यालयात हे अर्ज दाखल झाले आहेत.
कागदपत्रांसाठी दमछाक
निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तब्बल १६ ते १७ कागदपत्र जमविताना कसरत करावी लागत आहे. त्यातच तीन दिवस सुट्टया आल्याने कागदपत्रे गोळा करता आलेली नाहीत. आता कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे.