प्राण्यांबाबत संशोधन करण्यासाठी रत्नागिरीचा सुपूत्र सरसावला....
By Admin | Updated: July 22, 2016 15:51 IST2016-07-21T22:03:35+5:302016-07-22T15:51:42+5:30
आशिष लाड : वन्यजीव शास्त्राबाबत लहानपणापासूनच आवड--वेगळ्या वाटेची तरुण पिढी
प्राण्यांबाबत संशोधन करण्यासाठी रत्नागिरीचा सुपूत्र सरसावला....
मेहरुन नाकाडे- रत्नागिरी --सृष्टीवरील प्रत्येक प्राणीमात्रांच्या अन्न घटकांची एक अन्नसाखळी ठरलेली असते. या साखळीतील एक घटक कमी झाला तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कटते. मांसभक्षीय प्राण्यांचा आहार तृणभक्षीय प्राणी आहेत. भक्षाच्या शोधार्थ ते मानवी वस्तीकडे वळतात. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. वन्य प्राण्यांबाबतच्या संशोधनासाठी स्थानिकांनीच पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आशिष लाड याने ‘लोकमत’शी बोलताना केले.
आशिषचे वडील अशोक लाड हे वन विभागात कार्यरत असल्यामुळे आशिषला पहिल्यापासून जंगलांची आवड होती. वडिलांची सतत बदली होत असल्यामुळे त्याचे प्राथमिक शिक्षण राजापूर, उच्च प्राथमिक शिक्षण सावर्डे, माध्यमिक शिक्षण पाली तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत झाले. बी. एस्सी. फॉरेस्ट्रीसाठी आशिष याने दापोली येथील कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. बी. एस्सी. पूर्ण झाल्यानंतर त्याचे मित्र एम. एस्सी.ची तयारी करत असतानाच आशिष याने भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून येथे एम. एस्सी.साठी ‘वन्यजीव परिस्थितीकी’ हा विषय निश्चित करून प्रवेश घेण्याचे ठरविले. मात्र, या संस्थेची दोन वर्षातून एकदाच परीक्षा होत असल्यामुळे वर्ष वाया जाणार होते. त्यामुळे त्यांनी भारतीय वन अनुसंधान संस्था, डेहराडूनची प्रवेश परीक्षा दिली. या परीक्षेत आशिष संपूर्ण भारतात सातवा तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
‘वन्यजीव परिस्थितीकी’ हा अभ्यासाचा विषय होता. त्याचवेळी त्यांनी चांदोली राष्ट्रीय उद्यान व सह््याद्री व्याघ्र प्रकल्प येथे राहून बिबट्यावर संशोधन केले. बिबट्यावर संशोधन करत असताना बिबट्याचा वावर, त्याचे क्षेत्र, आहार, मांसभक्षीय प्राण्यांवर होणारे परिणाम याचा अभ्यास त्याने केला.
एम. एस्सी. पूर्ण झाल्यानंतर आशिषला पीएच. डी.साठी संधी मिळाली. मात्र, पीएच. डी. न करता आशिष आता स्पर्धा परीक्षेकडे वळला आहे. ‘महाराष्ट्र वनसेवा’ची परीक्षा पास होऊन तो मुलाखतीपर्यंत पोहोचला. परंतु, त्यापुढील यादीत नाव नसल्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा जोमाने त्याने अभ्यास सुरू केला आहे. ‘जंगल व तेथील वन्यप्राणी’ हा त्याचा आवडीचा विषय असल्यामुळे त्याची भटकंती सुरूच असते.
कोकणातील जैवविविधतेचा तो सातत्याने अभ्यास करत असतो. वन्यप्राण्यांचा अभ्यास करताना फोटोग्राफी करावीच लागते. आशिषला फोटोग्राफीचा छंदही आहेच. बी. एस्सी. करत असताना दापोलीतील विविध शाळांमध्ये फिरून विद्यार्थ्यांना निसर्गसंपदा, प्राणी यांची माहिती लघुपट सादरीकरणातून त्याने दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने या उपक्रमाची दखल घेत आशिषला एनएसएसचा ‘उत्कृष्ट स्वयंसेवक’ म्हणून २०१२ साली गौरविले. डेहराडून येथे एम.एस्सी. करत असताना आंतरविद्यापिठीय फोटोग्राफी स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला.
वन्यजीवांचा अभ्यास करत असताना फोटोग्राफीतून त्यांचा वावर, दिनचर्या चित्रबध्द केली. जंगले नष्ट होत आहेत. जंगले, गवत नष्ट झाल्यामुळे तृणभक्षीय प्राण्यांची संख्या घटत आहे. तृणभक्षीय प्राणी मांसभक्षीय प्राण्यांचा आहार आहेत. त्यामुळे आहाराच्या शोधार्थ आता बिबटे मानवीवस्तीकडे वळू लागले आहेत. बिबट्या हा भित्रा प्राणी आहे. तो सहसा मानवावर हल्ला करत नाही. परंतु, त्याची दृष्टी थोडी अंधूक असल्यामुळे प्राणी समजून अनेकवेळा तो मानवावर हल्ला करतो. बाहेर प्रात:विधीसाठी बसलेला मानव किंवा जंगलात वाकून पाने किंवा वनस्पती गोळा करणारी व्यक्ती त्याला प्राणी भासत असल्यामुळेच तो हल्ला करतो. कोणताही प्राणी असो त्याला इजा झाल्यास अथवा त्याला धोका आहे असे वाटल्यास तो हल्ला करतो, अन्यथा तो आपल्या विश्वात असतो. बिबट्यांची संख्या कमी झालेली नाही.
पूर्वीच्या काळी जंगले मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे तेथे वावरणाऱ्या प्राणीमात्रांसाठी आहार देखील मुबलक होता. जंगले नष्ट झाल्यामुळे तृणभक्षीय प्राण्यांची संख्या घटत आहे ती वाढली पाहिजे, त्यासाठी जंगलांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. तसेच शिकारीवर निर्बंध घालणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जनतेमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. स्थानिकांना याबाबतची अधिक माहिती असते. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांनी या वन्यजीव अभ्यासाकडे वळले पाहिजे.
कोकणात वाघांची संख्या खूप कमी आहे. कारण वाघांचा वावर असणारी जंगलेच या ठिकाणी उपलब्ध नाहीत. व्याघ्र प्रकल्प उभारून वाघांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांबरोबर कोकणातील पक्षी, इतर प्राणी यांचाही अभ्यास सुरू आहे. कोकणातील वनस्पती, त्यांच्या प्रजाती हळूहळू नष्ट होऊ लागल्या आहेत.
काही वनस्पती या औषधी, उपयुक्त आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. यांची माहिती संकलित करत असून, लोकांना त्यांची उपयुक्तता पटवून सांगत आहेत. हे सर्व करत असतानाच सध्या आशिष ग्रामीण विकास विषयात एम. ए. देखील करत आहेत.
बिबट्याच्या सवयी
बिबट्यासारखे प्राणीदेखील आपल्या अधिवासात एकमेकांशी भांडतात. त्यामध्ये जो शक्तिमान ठरतो तोच आपला हक्क शाबित करून त्या ठिकाणी राहतो. हरणारा प्राणी तेथून बाहेर पडतो व स्वत:साठी वेगळे स्थान शोधतो. या बिबट्याबद्दल अनेक गैरसमज सध्या आपल्या लोकांच्या मनात आहेत, असे आशिष लाड याने सांगितले.