रत्नागिरीकरांना प्रांताधिकाऱ्यांची ३ महिने प्रतीक्षा
By Admin | Updated: June 24, 2016 00:44 IST2016-06-24T00:03:19+5:302016-06-24T00:44:37+5:30
तीन महिन्यानंतरही अधिकारी नाही : जातीचे, नॉन क्रिमिलेअर दाखल्यांचा निपटारा करताना होतेय कसरत

रत्नागिरीकरांना प्रांताधिकाऱ्यांची ३ महिने प्रतीक्षा
रत्नागिरी : रत्नागिरीच्या प्रांताधिकारीपदी कार्यरत असलेले प्रसाद उकार्डे यांची मार्च महिन्यात बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या बदलीला आता तीन महिने होत आले तरी अजूनही त्यांच्या पदावर नियुक्ती न झाल्याने रत्नागिरी व संगमेश्वरवासीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच शैक्षणिक प्रवेशासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या सहीनिशी आवश्यक असणारे जातीचे तसेच नॉन क्रिमिलेअर दाखल्यांचा निपटारा होताना कसरत करावी लागत आहे.
रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे यांची मार्च महिन्यात नाशिक येथे बदली झाली. त्यांचा अतिरिक्त कार्यभार चिपळूणचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी विजय राठोड रत्नागिरीत आल्यानंतर त्यांच्याकडे मे महिन्यात या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याही प्रशिक्षणाची मुदत संपल्याने ते पुढील प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा ही जबाबदारी हजारे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडे चिपळूणचाही पदभार असल्याने ते रत्नागिरीत आल्यानंतर दाखल्यांवर सह्या होत आहेत.
सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी मुलांची आणि पालकांची विविध दाखल्यांसाठी पळापळ सुरू आहेत. नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या सहीने मिळणारे दाखले चटकन मिळत आहेत. मात्र, जातीच्या तसेच नॉन क्रिमीलेअर, आदी दाखल्यांवर प्रांताधिकारी यांचीच सही आवश्यक असल्याने हे दाखले मिळण्यासाठी रत्नागिरीतील नागरिकांची मोठी अडचण होत आहे.
त्यातच चिपळूण प्रांताचा कार्यभार सांभाळतानाच रत्नागिरीचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. रत्नागिरी आणि चिपळूण ही दोन्हीही कार्यक्षेत्रे मोठी असल्याने प्रांताधिकारी हजारे यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. चिपळूण येथील महत्वाच्या सुनावणी, निर्णय मार्गी लावतानाच रत्नागिरीतील कामाचा आवाका सांभाळावा लागत आहे. त्यातच आता दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालक यांचीही धावपळ झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडील कामांचे महत्व लक्षात घेऊन हजारे यांना आठवड्यातील काही दिवस रत्नागिरीला द्यावे लागत आहेत. यामुळे कामांचा निपटारा करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेले तीन महिने रत्नागिरीला नवीन प्रांताधिकारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. रत्नागिरीकर नव्या प्रांताधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)
शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ सुरू आहे. शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले जमा करावे लागत आहेत. प्रांत कार्यालयात या दाखल्यांसाठी गर्दी होत असून, प्रांताधिकारी नसल्याने या दाखल्यांचा निपटारा होत नाही.