रत्नागिरीत पारा चढला, सतर्कतेच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:20 IST2020-02-29T18:19:55+5:302020-02-29T18:20:55+5:30
गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यासाठी सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरीत पारा चढला, सतर्कतेच्या सूचना
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यासाठी सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गेली काही वर्षे हवामानात खूप मोठा फरक पडत आहे. किनारपट्टी भागाला या बदलांचा खूप मोठा सामना करावा लागत आहे. गतवर्षात क्यार, फनी आणि माहा अशा तीन वादळांनी किनारपट्टीला दणका दिला. या वादळांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्यक्षात खूप मोठे नुकसान झाले नसले तरी त्याचा वातावरणावर खूप मोठा परिणाम झाला. क्यार वादळामुळे पावसाने खूप मोठा धुमाकूळ घातला. त्यानंतर माहा वादळामुळेही वातावरणात मोठा बदल झाला.
वातावरणातील या बदलांचा अनुभव गेली काही वर्षे सातत्याने येत असून, त्याचा आंबा, काजूच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्याशिवाय कोकणातील वातावरणातही मोठा बदल झाला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ३५०० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. यावर्षी तो ५००० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. जानेवारी महिन्यापर्यंत थंडीचा पत्ताच नव्हता. मधेमधे आलेल्या थंडीच्या लाटा वगळता जिल्ह्यात थंडीचा अनुभवच आला नाही.
थंडीअभावी आंबा, काजूचा हंगाम पुढे गेला. जानेवारी महिन्यात तापमान कमी झाले. मात्र, अपवादात्मक दिवशीच ते १६-१७ अंशापर्यंत घसरले. अन्यवेळी ते अधिकच होते. अवघा दीड महिनाच पारा कमी होता. आता पारा अचानक उसळला असून, गुरूवारी रत्नागिरीमध्ये ३६ अंश इतके तापमान नोंदले गेले आहे.
येत्या चोवीस तासात दिवसभरात उष्णतेच्या लाटा उसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तापमान अधिक असेल, उन्हाच्या झळा अधिक असतील, असा इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाळा सुरू होताना इतके तापमान असेल तर नजीकच्या काही दिवसात तयार होणारा आंबा करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.