कोकणात गुणवत्ता असून, योग्य मार्गदर्शनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:30+5:302021-09-26T04:34:30+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणात गुणवत्ता आहे. मात्र, कोकणातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. माझ्याकडून जे ...

कोकणात गुणवत्ता असून, योग्य मार्गदर्शनाची गरज
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणात गुणवत्ता आहे. मात्र, कोकणातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. माझ्याकडून जे मार्गदर्शन आवश्यक असेल ते देण्यासाठी मी सदैव तयार असल्याचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशाच्या यादीत २३६ वा क्रमांक प्राप्त केलेल्या प्रथमेश राजेशिर्के यांनी सांगितले.
प्रश्न : स्पर्धा परीक्षेचा निर्णय केव्हा झाला?
उत्तर : स्पर्धा परीक्षा देण्याचे ध्येय सुरुवातीपासून होते, मात्र ‘बीटेक’चा अभ्यास करताना, परीक्षा द्यायचीच या निर्णयाशी ठाम राहिलो. याबाबत वडिलांशी बोललो, त्यांनीही पाठिंबा दिल्यावर मानसिकदृष्ट्या तयार झालो.
प्रश्न : लोकसेवा आयोग परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीलाच जायला हवे का?
उत्तर : लोकसेवा आयोगाची परीक्षा पदवीनंतर द्यायची आहे. मात्र, त्यासाठी दिल्लीतच जाण्याची आवश्यकता नाही. योग्य मार्गदर्शन असेल, अभ्यास कसा व कोणता करावा यावर लक्ष केंद्रित केलं व कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठेही राहून अभ्यास करता येतो. आता ऑनलाईन क्लासेसही उपलब्ध आहेत. त्याचाही फायदा होऊ शकतो.
प्रश्न : गुणवत्ता यादीत चमकण्याची खात्री होती?
उत्तर : पदवीनंतर एक वर्ष नोकरी केली; परंतु नोकरीत असल्याने अभ्यासाला फारसा वेळ देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, माझे शिक्षण शैक्षणिक कर्ज घेऊन झाल्याने मी प्रथम कर्ज फेडले. नोकरी सोडण्यापूर्वी बाबांशी बोललो. सुरुवातीला मी स्वत:च अभ्यास करीत होतो. नंतर मी दिल्लीत गेल्यावर क्लास लावला. नोकरीत असल्यामुळे दोन पूर्वपरीक्षेत गुण कमी पडले, परंतु न खचता अधिक अभ्यास करायचे ठरविले. कमीत कमी नाही तर जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे ध्येय बाळगले. नोकरी सोडल्यामुळे सलग १४ ते १५ तास अभ्यास करू लागलो. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा चांगली झाली. मुलाखतीनंतर खात्री पटली आपण नक्की यश मिळवू. शुक्रवारी निकाल लागला, गुणवत्ता यादीत आपला क्रमांक आल्याने खूपच आनंद झाला.
प्रश्न : स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी?
उत्तर : स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी असेल, तर मनोधैर्य भक्कम, कष्ट करण्याची तयारी व अभ्यासाची चिकाटी असणे गरजेचे आहे. साडेसहा लाख विद्यार्थ्यांमधून ७५० विद्यार्थ्यांची निवड होत असल्याने कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. अभ्यासासाठी १०० टक्के नाही, तर ११० टक्के तयारी ठेवावी लागते. शिवाय चुकीच्या व्यक्तींपासून सल्ला घेण्याऐवजी योग्य व्यक्तींचेच मार्गदर्शन नक्कीच दिशादर्शक ठरते.
इंटरनेटद्वारे अभ्यास
स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन वर्ग खूप आहेत. मात्र, योग्य व चांगला वर्ग निवडून अभ्यास करावा. मांडकीत राहून मी प्रिंटर व इंटरनेट कनेक्शन घेऊनच अभ्यासाला सुरुवात केली. वडिलांनी, तर अभ्यासाबाबतीत कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मीही पूर्णवेळ अभ्यासाकडे लक्ष देऊ शकलो. यश संपादन करायचे असेल तर अभ्यास महत्त्वाचा आहे. वाचन,लेखनाचा सराव महत्त्वपूर्ण आहे. वर्तमानाचे ज्ञानही आवश्यक आहे. अभ्यासासाठी सुविधांची आवश्यकता आहे, असे मात्र नाही.
कुटुंब, मित्रांचे पाठबळ
वडील माजी सैनिक, आई गृहिणी, मात्र एकत्रित कुटुंब असल्याने कुटुंबाचे पाठबळ सतत लाभले. कर्ज काढून मी माझे शिक्षण पूर्ण केले; परंतु एक वर्ष नोकरी करून कर्ज स्वत: फेडले. लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी मला शिष्यवृत्ती मिळाली. चांगल्या पगाराची नोकरी सोडताना अभ्यास करून परीक्षेत यश मिळविण्याचे ध्येय निश्चित केले. अनेक कठीण प्रसंग आले; मात्र वेळोवेळी कुटुंब, मित्रांचे पाठबळ लाभल्यानेच यश संपादन करू शकलो.