शाळा डिजिटल करण्याला ‘हायस्पीड’
By Admin | Updated: June 24, 2016 00:43 IST2016-06-24T00:02:56+5:302016-06-24T00:43:44+5:30
जिल्हा परिषद : खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न, गळती कमी होण्याची अपेक्षा

शाळा डिजिटल करण्याला ‘हायस्पीड’
रत्नागिरी : खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मागे पडू नयेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलेही स्पर्धेच्या युगासाठी तयार व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर विशेष भर दिला जात आहे. जिल्ह्यातील ३,३३३ शाळांपैकी ११५३ शाळा डिजिटल झाल्या आहेत. ७९८ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत, तर ३५५ शाळा मोबाईल डिजिटल करण्यात आल्या आहे.
इंग्रजी माध्यमांचे आकर्षण असल्यामुळेच खासगी शाळांमधील पटसंख्या वाढत असतानाच जिल्हा परिषदेच्या शाळांना मात्र गळती लागली आहे. पहिली ते चौथी तर काही ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतच्या प्राथमिक शाळा आहेत. जिल्ह्यात १ ते ५ पटसंख्या असलेल्या १६६ तर ६ ते १० पटसंख्या असलेल्या ३०८ शाळा आहेत. कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा ई - लर्निंगमध्ये आघाडीवर आहेत. या शाळांमधून विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. जेणेकरून मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
शहरातील खासगी शाळांमध्ये ई - लर्निंग अध्यापन पद्धती संगणकीय प्रशिक्षण सुरु आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण मिळावे व गळती रोखावी, याकरिता डिजिटल क्लासरुम संकल्पना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यात येत आहेत. जिल्ह्यात चिपळूण व गुहागर तालुक्यात सर्वाधिक शाळा डिजिटल झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचा तंत्रस्नेही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला असून, याद्वारे नवनवीन तंत्रज्ञान शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांपासून गटशिक्षणाऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. शिक्षकांसाठी असणाऱ्या सूचनादेखील याठिकाणी टाकल्या जातात. (प्रतिनिधी)
मोबाईल डिजिटल स्कूल
१६१ शिक्षकांनी गणित विषयाचा व्हिडिओ, १७८ शिक्षकांनी भाषेचा व्हिडिओ तर ८६ शिक्षकांनी शैक्षणिक मोबाईल अॅप तयार केले आहे. टॅब व एलसीडीद्वारे डिजिटल क्लासरुममध्ये अध्यापन करण्यात येत आहे. कमी पटसंख्येच्या शाळेत टॅब, मोबाईलचा वापर केला जातो. शैक्षणिक अॅपमुळे कविता, गणित तसेच अन्य विषयांचे अध्यापन केले जाते. अॅपद्वारे प्रश्ननिर्मिती होत असल्याने मुलांना आकलन होते. विद्यार्थ्यांना एखादा विषय समजावताना उदाहरणे देण्यापेक्षा चित्रफितीमुळे चटकन समजते.
काय आहे ई-लर्निंग...!
वर्ग अध्यापनात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच ‘ई-लर्निंग’. ई-लर्निंग अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना चटकन आकलन होते. जेथे ई-लर्निंग उपलब्ध आहे, अशा शाळांना डिजिटल शाळा म्हणतात. २५१ केंद्रांमध्ये डिजिटल क्लासरुम सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील १०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
१९२३ शाळांची प्रगती चांगली
अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत एलसीडीचा वापर केला जात आहे. डिजिटल क्लासरूमध्ये प्रोजेक्टर, एलसीडी, इंटरअॅक्टीव्ह बोर्ड बसविण्यात येते. चित्र काढण्यापासून गणितांची उजळणी, गद्यपद्याचे अध्यापन करणे सोपे झाले आहे. इंटरनेटमुळे भूगोल शिकवताना विदेश सफर ‘ई लर्निंग’ मुळे घडविली जाते. ज्ञानरचना अध्यापन पद्धतीनुसार १९२३ शाळांमध्ये अध्यापन सुरु आहे.