मुसळधार पावसाने जिल्ह्यात हानी
By Admin | Updated: June 26, 2016 00:34 IST2016-06-26T00:34:22+5:302016-06-26T00:34:22+5:30
घरे-गोठ्यांची पडझड : गुहागर एस. टी. स्थानकात पाणीच पाणी; पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

मुसळधार पावसाने जिल्ह्यात हानी
रत्नागिरी : शुक्रवारपासून संततधारेने सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरे, गोठ्यांची पडझड झाली आहे. रत्नागिरीनजीकच्या मुरुगवाडा येथील एका घराजवळील खड्डा पावसाने मोठा होत गेला असून या घराला धोका निर्माण झाला आहे. तसेच गुहागर येथे एस. टी. स्थानक परिसराला तलावाचेच रूप आले आहे. खेड येथे दरड कोसळल्याने माती मार्गावर आली आहे.
गुरुवार रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारीही दिवसभरात अनेकवेळा जोरदार सरी कोसळल्या. रात्रीपासून पुन्हा पावसाला अधिकच जोर आला. शनिवारीही सकाळपासूनच संततधार सुरूच होती. दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या मुरुगवाडा येथील सागर शिरधनकर यांच्या घराशेजारी खड्डा पडला असून, या पावसाने तो मोठा होत गेला आहे. त्यामुळे या घराला धोका निर्माण झाला आहे.
चिपळूण तालुक्यातील विल्ये येथील दीपक भुवड यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे, तर डॉ. केळकर यांच्या घराभोवतालची संरक्षक भिंत कोसळली आहे. कोझरवाडी येथील बाळ नाके यांच्या घराच्या पडवीवर नारळाचे झाड पडल्याने नुकसान झाले आहे.
गुहागर शहरात पाणी भरले असून एस. टी. व त्यासमोरील रस्त्याला चक्क तलावाचेच रूप आले आहे. गुहागर-चिखली-कारूळ रस्त्यावरील दोन ठिकाणी मोरी खचल्या आहेत. तसेच पालपेणे-साखरी-त्रिशुळ मार्गावरील मोरी ढासळली आहे. काजुर्ली येथील प्रमिला मोहिते यांच्या घरावर फांदी पडल्याने कौले फुटून ४५५० रुपयांचे नुकसान झाले आहे. साखरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ ची कंपाऊंड वॉल कोसळून २९,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
खेड येथे सकाळी दरड कोसळल्याने माती रस्त्यावर आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने ही माती दूर हटवली. दापोली तालुक्यातील हर्णे येथील रमाकांत कवळे तसेच सुनंदा बोरकर यांच्या घरांचे अंशत: २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच नथुराम वैद्य यांच्या घराच्या कुंपणाची भिंत कोसळून १ लाख ५ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. गव्हे येथे आग्रे यांच्या गोठ्याचे अंशत: नुकसान झाले आहे.
मंडणगड तालुक्यातही या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. भिंगळोली येथील मनीषा चव्हाण यांच्या घराचे १४,८५० रुपयांचे नुकसान झाले आहे. घरावरील सिमेंटचे पत्रे फुटले असून, दरवाजा मोडला आहे. मधुकर मर्चंडे यांच्या घरावर बांध कोसळला असून सिमेंटचे पत्रे, कौले फुटली आहेत. पालघर येथील चंद्रकांत तपकिरी यांचे कंपाऊंड अंशत: कोसळल्याने १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी येथील रुक्मिणी वाडकर (३६ हजार), सुरेंद्र वाडकर (८ हजार ३00), ममता वाडकर (८ हजार) आणि सरिता सुतार (१ हजार ३00) यांच्या घराचे नुकसान झाले आहे.
राजापूर बाजारपेठमधील वरची वाडी येथील बाळकृष्ण खडपे यांची पडवी कोसळल्याने ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या २४ तासात जिल्ह्यात दापोलीत सर्वाधिक पाऊस (१७३ मिलीमीटर) पडल्याची नोंद असून त्याखालोखाल मंडणगड (१५६ मिलीमीटर ) व गुहागरमध्ये (११४ मिलीमीटर) पाऊस पडला आहे. चिपळूण (७२ मिलीमीटर), रत्नागिरीत (७९ मिलीमीटर) मध्यम, तर संगमेश्वर (३३ मिलीमीटर), लांजा (३१ मिलीमीटर) आणि राजापूरमध्ये (३८ मिलीमीटर) कमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
पुन्हा मुुसळधार?
येत्या ४८ तासांत काही ठिकाणी ७ ते २० सेंटीमीटर्सपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे.