भारताच्या निसटत्या विजयाच्या आनंदोत्सवातच त्यांनी मृत्यूला कवटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 16:01 IST2019-06-24T15:59:06+5:302019-06-24T16:01:53+5:30
भारत ़अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला निसटता विजय मिळाल्याच्या अतिउत्साहाने आंबव पोंक्षे येथील गणपत जानू घडशी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

भारताच्या निसटत्या विजयाच्या आनंदोत्सवातच त्यांनी मृत्यूला कवटाळले
देवरूख : भारत-अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला निसटता विजय मिळाल्याच्या अतिउत्साहाने आंबव पोंक्षे येथील गणपत जानू घडशी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
आंबव (पोंक्षे )गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेट सामन्याचे शौकिन होते.मुंबईला शासकीय सेवानिवृत्त झाल्यानंतर ते गावीच रहात होते. सेवेत असल्यापासूनच क्रिकेट हा त्यांचा आवडीचा विषय होता.
शनिवारी रात्री ११ वाजता भारत-अफगाणिस्तान सामना रंगला असताना आपण पराभूत होणार या निराशेने ते प्रचंड नाराज होते.
शेवटच्या षटकात आपल्या चेंडूवर चार धावा दिल्याने त्यांनी त्याला प्रचंड शिव्यांचा भडीमार केला. पण लगेचच पुढे तीन विकेट घेत विजय मिळवल्याने ते आराम खुचीर्तून दोन हात वर करत ताडकन उठले.
अरे आपण जिंकलो, भारताचा विजय झाला, असे मोठ्याने ओरडले आणि धाडकन जमिनीवर कोसळणार तेवढ्यात मुलगा मंगेशने त्यांना सावरले. पण त्यांनी शेवटचा श्वास सोडला.
झाल्या प्रकाराने सारेच कुटुंब गोंघळून गेले, त्यांना तातडीने माखजन आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं होते. रविवारी दुपारी आंबव घडशीवाडी येथील स्मशानात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.