मित्राच्या वडिलांनीच विशाखाला संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:08 IST2018-12-29T18:07:23+5:302018-12-29T18:08:27+5:30
आपल्या मुलाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने मित्राच्या वडिलांनीच विशाखा अजय महाडीक (१८, कसबा) हिचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मित्राचे वडिल सुनिल रामचंद्र गुरव (४७, चेंबूर, मुंबई, मूळ फणसवणे गुरववाडी) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.

मित्राच्या वडिलांनीच विशाखाला संपवले
देवरूख : आपल्या मुलाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने मित्राच्या वडिलांनीच विशाखा अजय महाडीक (१८, कसबा) हिचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मित्राचे वडिल सुनिल रामचंद्र गुरव (४७, चेंबूर, मुंबई, मूळ फणसवणे गुरववाडी) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.
विशाखा महाडीक (१८, कसबा) ही तरूणी ०१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाला जाते, असे सांगून घरातून निघून गेली होती. मात्र ती सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तिचा शोध सुरु झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.
दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील मोगरवणे खांबटमाळ या ठिकाणी बुधवारी सकाळी एका अज्ञात तरूणीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी बेपत्ता तरूणींचा शोध घेतल्यानंतर विशाखा महाडीक हिचे नाव पुढे आले. पोलिसांनी तिच्या आईवडिलांना बोलावून मृतदेह दाखवल्यानंतर तो आपल्या मुलीचाच असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी मित्र-मैत्रिणींची चौकशी सुरु केली. मित्रांची तपासणी सुरु असतानाच मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र सुनील गुरव याच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने विसंगत माहिती दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपणच विशाखा हिचा खून केल्याचे मान्य केले.विशाखा महाडीक व आपला मुलगा महेंद्र यांच्यात प्रेमसंबंध होते. त्याची कुणकुण आपल्याला लागली होती. हे प्रेमसंबंध आपल्याला मान्य नव्हते. म्हणून विशाखा हिला संपवायचेच, या हेतूने आपण मुंबईतून गावी आलो होतो.
आपण १ डिसेंबर रोजी विशाखा हिला देवरूख बसस्थानकावर बोलावून घेतले. त्यानंतर तिला एका रिक्षातून मोगरवणे येथील जंगली भागात नेले. त्याठिकाणी तिला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि ओढणीने गळा आवळून तिला ठार केल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सुनील गुरव याला भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.