मच्छीमारी नौकांना दंड!
By Admin | Updated: June 23, 2016 01:26 IST2016-06-22T23:58:19+5:302016-06-23T01:26:08+5:30
बंदी आदेश मोडला : खटल्यांची सुनावणी लवकरच...

मच्छीमारी नौकांना दंड!
रत्नागिरी : पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा आदेश डावलून मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या वरवडे येथील ४० नौकांवर सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अन्वये रत्नागिरीच्या तहसीलदारांनी मंगळवारी रात्री खटले दाखल केले आहेत. या खटल्यांची सुनावणी येत्या काही दिवसात तहसीलदारांसमोर होणार आहे.
ज्या नौकांवर जेवढ्या किंमतीचे मासे सापडले त्याच्या चार ते पाचपट दंड ठोेठावला जाऊ शकतो. तर मासे नसलेल्या नौकांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४० नौकांसाठी मिळून २ लाखांच्यावर दंड वसुली होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१० जूनपासून सागरी मासेमारीला शासनाने पावसाळ्यात बंदी घातली आहे. मात्र, या कालावधीतही सागरी मासेमारीला काही नौका जात असल्याच्या तक्रारी मत्स्य व्यवसाय खात्याकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत रत्नागिरीचे विभागाचे सहाय्यक मत्स्य आयुक्त एम. व्ही. भादुले यांनी त्यांच्या सहकारी अधिकारी व सागरी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने तालुक्यातील वरवडे येथे सागरी मासेमारीला गेलेल्या ४० नौकांवर कारवाई केली होती. या नौका पकडल्यानंतर त्यावरील १६ हजारांचे मासेही जप्त करण्यात आले होते. या कारवाईमुळे खोल समुद्रात बंदीच्या काळातही चोरून मच्छीमारी केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर मंगळवारी रात्री या सर्व नौका मालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. बंदी आदेश मोडून मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई झाल्याने सागरात छुपेपणाने मासेमारी करण्यास जाणारे अन्य भागातील नौकामालकही धास्तावले आहेत. मात्र मिरकरवाडा व अन्य काही ठिकाणच्या मच्छीमारी नौका छुपी मासेमारी करतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
नौका मच्छीमारांच्या ताब्यात..
कारवाईअंतर्गत पकडण्यात आलेल्या ४० मच्छीमारी नौका पुन्हा संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मत्स्य व्यवसाय खात्याकडे या नौका ठेवण्याची व्यवस्था नसल्याने नौकांचा ताबा मच्छीमारांना देण्यात आला आहे. याबाबत विचारता सहाय्यक मत्स्य आयुक्त एम्. व्ही. भादुले यांनी सांगितले की, ही कारवाई आता सुरूच राहणार आहे. दंडात्मक कारवाई केलेल्या नौका पुन्हा मासेमारीस गेल्या तर त्यांच्यावर पुन्हा खटले दाखल होतील. त्यानंतरही मासेमारीसाठी संबंधित नौका गेल्यास त्यांचे परवाने रद्द होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.