Ratnagiri: चिपळुणातील एन्रॉन पूल तब्बल पाच वर्षांनी वाहतुकीस खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:15 IST2025-04-24T16:15:04+5:302025-04-24T16:15:42+5:30
२०२१च्या महापुरात हा पूल मध्यवर्ती भागात खचला

Ratnagiri: चिपळुणातील एन्रॉन पूल तब्बल पाच वर्षांनी वाहतुकीस खुला
चिपळूण : महापुरात खचलेल्या गोवळकोट-पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पुलाची दुरुस्ती अखेर पूर्णत्वास गेली आहे. तब्बल पाच वर्षांनी मंगळवारी सायंकाळपासून या पुलावरील वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह चिपळूण बाजारपेठेतून गुहागरकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चिपळूणमधील २२ जुलै २०२१च्या महापुरात हा पूल मध्यवर्ती भागात खचला. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र स्थानिक नागरिकांची आणि लोटे एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगारांचीही मोठी गैरसोय होत होती. शिवाय मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पेठमापच्या अंतर्गत मार्गावर वाढल्याने सातत्याने वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींसह स्थानिकांकडून प्रयत्न सुरू झाले. आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ७० लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला.
या पुलाच्या कामासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून व तांत्रिक गोष्टी तपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरुवातीला दोन वेळा निविदा काढल्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा प्रक्रिया राबविल्यानंतर ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश दिले. परंतु त्या कंपनीने उशिराने कामाला सुरुवात केली. पावसाळ्यातील कालावधी सोडला, तर गेल्या दोन वर्षांपासून या पुलाच्या खालच्या भागातील अंतर्गत दुरुस्ती सुरू होती.
मात्र, आता अंतिम टप्प्यात पुलाच्या नवीन पाईल्वर बीमो बांधकाम, तात्पुरत्या कालावधीसाठी बीमवर लोड हस्तांतरण, विद्यमान पाईल आणि कॅपा नाश, बीमदरम्यान स्लॅबो बांधकाम पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या पुलावर लोड टेस्टिंग करण्यात आले. अवजड वाहतुकीसही पूल योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली.