पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास करण्यावर भर : उद्योगमंत्री उदय सामंत

By अरुण आडिवरेकर | Updated: September 22, 2022 18:40 IST2022-09-22T18:39:54+5:302022-09-22T18:40:17+5:30

फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी, त्याच्याशी संलग्न प्रकल्प राज्यातच असतील. त्यातून आगामी काळात राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा केला दावा.

Emphasis on development without damaging the environment says Industries Minister Uday Samant | पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास करण्यावर भर : उद्योगमंत्री उदय सामंत

पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास करण्यावर भर : उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असून, तिथल्या उद्योगधंद्यांच्या विकासाचा प्रश्नही गंभीर आहे. कोरोना काळात काही छोटे उद्योग बंद पडले आहेत. जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास कसा करता येऊ शकेल, यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्ली येथे सांगितले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासात्मक प्रश्नांसंदर्भात दिल्ली येथे विविध खात्याच्या मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वेनाक्यांवर पूलबांधणी तसेच थांब्यांच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील उद्योगांना व रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी जालन्याप्रमाणे नाशिक, जळगाव, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, सांगली, भिवंडी, पुणे आदी जिल्ह्यांमध्येही मल्टी-लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार आहेत. दोन-तीन जिल्ह्यांसाठी मिळून एक मल्टी-लॉजिस्टिक पार्क असेल. त्यामुळे उत्पादनांच्या निर्यातीसाठी उद्योजकांना मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही. मल्टी-लॉजिस्टिक पार्कसाठी फक्त राज्याला जमीन उपलब्ध करून द्यावी लागणार असून, पार्क विकसित करण्याचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले

राजकीय वातावरण दूषित करू नये

भूमिपुत्रांना रोजगारांमध्ये प्राधान्य दिले जात नसल्याच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर, राजकीय वातावरण दूषित करण्यापेक्षा उद्योगांसाठी व राज्याच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असे मंत्री सामंत म्हणाले. फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी, त्याच्याशी संलग्न प्रकल्प राज्यातच असतील. त्यातून आगामी काळात राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा दावा त्यांनी केला.

कोकणाच्या विकासाकडे लक्ष

रत्नागिरी-रायगड जिल्ह्यातील बंदरांचा व जेट्टींचा विकास केला जाईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन जेट्टी असून, तिथे जाण्यासाठी रस्त्यांचा विकास करण्याची गरज आहे. यासंदर्भात केंद्रीय वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग व रत्नागिरी-कोल्हापूर मार्गाचाही विकास केला जाणार असल्याचे सांगितले.

Web Title: Emphasis on development without damaging the environment says Industries Minister Uday Samant