यंदा दिवाळीत मिठाईला महागाईची झळ, दुग्धजन्य मिठाईच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:09 IST2018-10-27T17:06:48+5:302018-10-27T17:09:24+5:30
दिवाळीतील विशेष फराळासोबतच घरी येणाऱ्या पाहुण्यांचे गोड स्वागत करण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मिठाईला महागाईची झळ बसली आहे. दुधाच्या दरांत लिटरमागे दोन रूपयांनी झालेल्या वाढीमुळे दुग्धजन्य मिठाईच्या दरात किलोमागे ४० ते १०० रूपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये भेट देण्यात येणाऱ्या सुक्या मेव्याच्या दरांतही वाढ झाली आहे.

यंदा दिवाळीत मिठाईला महागाईची झळ, दुग्धजन्य मिठाईच्या दरात वाढ
रत्नागिरी : दिवाळीतील विशेष फराळासोबतच घरी येणाऱ्या पाहुण्यांचे गोड स्वागत करण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मिठाईला महागाईची झळ बसली आहे. दुधाच्या दरांत लिटरमागे दोन रूपयांनी झालेल्या वाढीमुळे दुग्धजन्य मिठाईच्या दरात किलोमागे ४० ते १०० रूपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये भेट देण्यात येणाऱ्या सुक्या मेव्याच्या दरांतही वाढ झाली आहे.
गतवर्षी मिठाईवर ५ टक्के जीएसटी लागू करण्यात आल्याने मिठाईच्या किमतीत वाढ झाली होती. यावर्षी दुधाच्या वाढलेल्या दरामुळे मिठाईच्या किमती वाढल्या आहेत. दुधापासून तयार होणारी मावा बर्फी, रबडी, बासुंदी, श्रीखंड, बंगाली मिठाई, काजुकतली, बदाम बर्फी यांच्या दरात वाढ होणार आहे.
बंगाली मिठाईचा एक नग सध्या ३० रूपये दराने विकण्यात येत आहे. मात्र लवकरच ३५ रुपयाने विक्री होणार आहे. केशरी श्रीखंड २८० रुपये किलो दराने विकण्यात येत होते, आता हेच श्रीखंड ३०० रुपये दराने विकण्यात येणार आहे.
दिवाळीच्या सणात सुका मेवा भेट देण्यात येतो. विविध कंपन्यांकडून ड्रायफ्रूट बॉक्ससाठी विशेष मागणी असते. सुकामेवा बहुधा परदेशातून आयात होत असतो. यावर्षी परदेशातून अंजीर आणि पिस्त्याची आयात घटली आहे.
अंजीर ६०० रुपयांनी महागले
अंजीरच्या दरात प्रति किलो ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो अंजीरची विक्री १६०० ते १८०० रुपये किलो दराने होत आहे. तसेच पिस्ता ४०० रूपयांनी महागला असून १४०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
अन्य मेव्यांचे दर स्थिर
अन्य सुक्या मेव्याचे दर स्थिर आहेत. काजू १२०० रूपये किलो, बदाम ७०० ते १५०० रूपये, नमकीन पिस्ता ८०० ते १००० रूपये किलो, खारीक २०० ते २५० रूपये किलो, मनुके १५० ते ३०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे.