नारिंगी नदीने घेतला मोकळा श्वास

By Admin | Updated: June 25, 2016 00:54 IST2016-06-24T23:40:40+5:302016-06-25T00:54:13+5:30

पर्यावरण मंत्र्यांचे आदेश : गाळासह झाडे-झुडपे तोडल्याने नदीचे पात्र झाले चकाचक

The breathing of the orange river took place | नारिंगी नदीने घेतला मोकळा श्वास

नारिंगी नदीने घेतला मोकळा श्वास

दस्तुरी : बारमाही वाहणारी अन् पुराच्या विळख्यात अडकणारी नारिंगी नदी ही समस्यांच्या गर्तेतच अडकली होती. नारिंगीचे नदीपात्र झुडपांच्या वेढ्यात अडकल्याने बकाल बनले होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नदीतील गाळासह झुडपे तोडण्याचे आदेश देताच याची तत्काळ अंमलबजावणी झाल्याने बऱ्याच वर्षानंतर नारिंगी नदीने मोकळा श्वास घेतला आहे.
अतिवृष्टीत दरवर्षी नारिंगी नदी उग्ररुप धारण करते. नारिंगीचे पाणी सभोवतालच्या शेतात घुसून भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तुफानी पर्जन्यवृष्टी झाल्यास नारिंगीचे पाणी कन्या शाळेनजीक घुसत असल्याने जनजीवन विस्कळीत होऊन खेड, दापोली, मंडणगड व खाडीपट्टा मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. मात्र, नारिंगी नदी पुलाची उंची वाढविण्यात आल्याने पुराच्या पाण्यातून सुटका होण्यासह विस्कळीत होणाऱ्या वाहतुकीलाही कायमचाच पूर्णविराम मिळाला होता. पण पुन्हा ही समस्या उद्भवली.
दोन वर्षापूर्वी जगबुडी नदीतील काढण्यात आलेल्या गाळामुळे खेडवासीयांची पुराच्या पाण्यातून सुटका झाली. जगबुडी नदीतील गाळ काढण्यात आल्यानंतर नदीने मोकळा श्वास घेतला. मात्र, हे करताना नदीपात्रातील झुडपे तोडण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. यामुळे नदीपात्राचा श्वास दिवसेंदिवस कोंडला जात आहे. नारिंगी नदीलाही झुडपांचा वेढा बसत असल्यामुळे नदी विद्रुप होत चालली होती. या नदीपात्रातील पाण्यावर परिसरातील शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, सद्यस्थितीत नदीपात्रदेखील कोरडे पडल्याने त्यात झुडपांची भर पडत होती. या झुडपांमुळे नदीपात्रात पाणीसाठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. वर्षानुवर्षे नारिंगी नदीपात्रात उगवणारी झुडपे तोडण्यासाठी कोणीही पुढाकार न घेतल्यामुळे या झुडपांचा विस्तार वाढतच होता. बहिरवली फाट्यापासून कुंभारवाड्यापर्यंतच्या परिसरातील नदीपात्रात झुडपेच झुडपे दिसून येत होती.
बारमाही वाहणारी ही नदी झुडपांमुळे दिवसेंदिवस बकाल होल चालली होती. ही बाब पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर गाळासह झुडपे तोडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर नदीपात्रातील गाळ उपसून झुडपेही तोडण्यात आल्याने नारिंगी नदीपात्र मोकळे झाले आहे. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)


नदीचे विस्तीर्ण पात्र : झुडपांमुळे विद्रुप
खेड तालुक्यातील नारिंगी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. पावसाळ््यात या नदीला पूर येऊन वाहतूक विस्कळीत होते. नदीच्या पुराच्या पाण्यामुळे खेड, दापोली, मंडणगड व खाडीपट्टा मार्गावरील वाहतुकीला फटका बसतो. या नदीतील गाळ काढण्यात आल्याने पुराचा फटका काहीअंशी कमी बसला. मात्र, नदीत झाडेझुडपे वाढल्याने नदीचे पात्र विद्रुप झाले होते. नदीचे बकाल रूप झाल्याने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नदीतील झाडे-झुडपे तोडण्याचे आदेश दिले होते.

Web Title: The breathing of the orange river took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.