गोवळकोट बंदरावरील ऐतिहासिक तोफा घेणार मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 14:20 IST2021-02-18T14:18:53+5:302021-02-18T14:20:00+5:30
Fort Chiplun Ratnagiri- चिपळूण शहरातील गोवळकोट बंदरावर जमिनीत पुरलेल्या स्थितीत असलेल्या ४ तोफा बाहेर काढून शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून राजे सामजिक प्रतिष्ठान व गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने किल्ले गोविंद गड येथे संवर्धन केल्या जाणार आहेत.

गोवळकोट बंदरावरील ऐतिहासिक तोफा घेणार मोकळा श्वास
चिपळूण : शहरातील गोवळकोट बंदरावर जमिनीत पुरलेल्या स्थितीत असलेल्या ४ तोफा बाहेर काढून शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून राजे सामजिक प्रतिष्ठान व गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने किल्ले गोविंद गड येथे संवर्धन केल्या जाणार आहेत.
गोविंद गडावर तसेच गोवळकोट बंदरावर आजही ऐतिहासिक तोफा पाहावयास मिळतात. गोवळकोट बंदरावर गेली कित्येक वर्षे पुरलेल्या अवस्थेत असलेल्या तोफा आतल्या आत गंजून त्यांचा भुगा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कोकणच्या लष्करी इतिहासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत मोलाचा ठेवा नष्ट होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन गोवळकोट बंदरावरील पुरलेल्या १० तोफांपैकी ६ तोफा काढून ऐतिहासिक किल्ले गोविंद गडावर सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सदर ऐतिहासिक तोफा पाहण्यासाठी अनेक गडप्रेमी, शिवप्रेमी येथे येतात.
आता उर्वरित चार तोफाही काढल्या जाणार आहेत. संवर्धन समिती सदस्य डॉ. सचिन जोशी, इतिहास अभ्यासक संदीप परांजपे, पुरातत्त्व विभाग, रत्नागिरी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, सीमा शुल्क विभाग, चिपळूण, तहसीलदार, पोलीस प्रशासन, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक व ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी हा कार्यक्रम होणार आहे. या तोफा गडप्रेमी, शिवप्रेमींसह पर्यटकांनाही आकर्षित करणाऱ्या असल्याने त्याचे चांगल्या पद्धतीने जतन झाले पाहिजे, ही मागणी आता पूर्णत्त्वास जात आहे.