भाजप जिल्ह्यात स्वबळावर लढणार
By Admin | Updated: June 25, 2016 00:41 IST2016-06-25T00:28:51+5:302016-06-25T00:41:38+5:30
बाळ माने : कार्यकारिणीची आजपासून दोन दिवस सभा

भाजप जिल्ह्यात स्वबळावर लढणार
चिपळूण : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाबद्दल द्वेष नाही; परंतु केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. सध्या अनुकूल काळ आहे. हवामान चांगले असेल तर पीक चांगले येते, हा नियम आहे. आम्हाला चांगले वातावरण आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार आहोत, अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. चिपळूणचा नगराध्यक्ष हा भाजपचाच होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज, शनिवारी सायंकाळी ५ वाजता माटे-भोजने सभागृह कापसाळ कॉलनी येथे सुरू होणार आहे. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीचे ९१ पदाधिकारी, अल्पसंख्याक सेल, महिला मोर्चा, युवा मोर्चा यांचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व सरचिटणीस मिळून १५० पदाधिकारी या कार्यकारिणीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी माने यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद घेतली. बैठकीला कोकण विभाग संघटनमंत्री सतीश धोंड, जिल्हा प्रभारी प्रदेश चिटणीस राजन तेली, आमदार प्रवीण दरेकर, प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याबरोबर संपर्कमंत्री प्रकाश मेहता उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला मोर्चाच्या सरचिटणीस नीलम गोंधळी, चिपळूण तालुकाध्यक्ष रामदास राणे, महिला तालुकाध्यक्षा मृणाल रावराणे, जिल्हा चिटणीस नंदू गोंधळी, महेश दीक्षित उपस्थित होते.
भाजप आता सत्तेत असून, दोन वर्षांच्या मोदी पर्वाच्या
काळात देशात विकासाची गंगा वाहत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, गुहागर-विजापूर मार्गाचे रुंदीकरण ही कामे गती घेत आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. भाजप येथे विकासकामांवर भर देत आहे, याची जाणीव कोकणवासीयांना आहे. आपण ज्यावेळी जिल्हाध्यक्ष झालो, तेव्हा पक्षाचे ४०० बूथ होते. आता ११०० बूथ तयार झाले आहेत. शतप्रतिशत भाजपचा नारा देत लवकरच १६५० पेक्षा जास्त बूथ पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संघटनात्मक कामाला गती आल्यामुळे पक्षाला फायदा होईल. आतापर्यंत आम्ही तडजोडीचे राजकारण केले. त्यामुळे भाजप तळागाळापर्यंत पोहोचू शकला नाही. परंतु, आता एक नवी जबाबदारी घेऊन आम्ही चाललो आहोत. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यकारिणीत चांगले निर्णय होतील. त्याचा पक्षाला फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)