रत्नागिरी बाजारपेठेला बाप्पा पावले, कोटीकोटी उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:39 IST2019-09-13T14:37:05+5:302019-09-13T14:39:10+5:30

कोकणातील सर्वात मोठ्या सणाने बाजारपेठेला आलेली मंदी काही प्रमाणात तरी दूर केली आहे. गणेशोत्सवासाठी म्हणून झालेल्या खरेदीविक्रीमध्ये दहा कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही उलाढाल पूर्णपणे रोख स्वरूपातच होत असल्याने गणेशमूर्ती, आरास, पूजा साहित्य, मिठाई अशा विविध माध्यमातून बाजारपेठेला झळाळी आली आहे.

Bappa steps to Ratnagiri market, Kotikote flights | रत्नागिरी बाजारपेठेला बाप्पा पावले, कोटीकोटी उड्डाणे

रत्नागिरी बाजारपेठेला बाप्पा पावले, कोटीकोटी उड्डाणे

ठळक मुद्देरत्नागिरी बाजारपेठेला बाप्पा पावले, कोटीकोटी उड्डाणेथंडावलेल्या व्यवहारांना तेजी, सर्व व्यवहार रोखीतच

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठ्या सणाने बाजारपेठेला आलेली मंदी काही प्रमाणात तरी दूर केली आहे. गणेशोत्सवासाठी म्हणून झालेल्या खरेदीविक्रीमध्ये दहा कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही उलाढाल पूर्णपणे रोख स्वरूपातच होत असल्याने गणेशमूर्ती, आरास, पूजा साहित्य, मिठाई अशा विविध माध्यमातून बाजारपेठेला झळाळी आली आहे.

जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५८७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. केवळ या मूर्तीकामातूनच सुमारे ९ ते १० कोटीच्या घरात उलाढाल झाली आहे. जिल्ह्यात अडीच ते तीन हजार मूर्तिकार आहेत. गणेशमूर्तीसाठी लागणारी माती, रंग याशिवाय मजुरीमध्ये वाढ होत असल्याने मूर्तीचे दरात दरवर्षी वाढत आहेत.

घरगुती गणपतींच्या मूर्तींचे दर १०० रूपयांपासून अगदी दहा हजार रूपयांपर्यंत आहेत. जिल्ह्यात प्रतिष्ठापना होणाऱ्या गणपतींची संख्या पाहिल्यास केवळ मूर्तींमुळेच ९ ते १० कोटी रूपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे.

याखेरीज आरास, पूजा साहित्य, मिठाई, फळे या प्रकारांमध्येही खूप मोठी उलाढाल झाली आहे. कोकणात येणारे मुंबईकर स्थानिक बाजारपेठेत खूप खरेदी करतात. अशा छोट्या-छोट्या व्यवहारांमधूनही खूप उलाढाल होते.

प्रसाद विक्रीतूनही उत्पन्न

बाप्पांसाठी तयार प्रसादही खरेदी केला जातो. पंचखाद्य, विविध कंपन्यांनी निरनिराळ्या स्वादातील मोदक, बर्फी, लाडू, पेढे, साखरफुटाणे याची खरेदी होते. याशिवाय मिठाई विके्रत्यांनी तयार उकडीचे मोदकांसाठी खास आॅर्डर असते. घरोघरी पूजा, भजनांचा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याने येणाऱ्या भाविकांसाठी चिवडा, लाडूचा खपही बºयापैकी होतो.

मिठाईला नफ्याची चव

गणपती बाप्पाला सहस्त्र लाडू /मोदक अर्पण केले जातात. मोठा मोदक किंवा मोठा लाडूदेखील ठेवला जातो. पूर्वी मुंबईतून मोठे लाडू आणले जात असत. परंतु आता रत्नागिरीतही पाव किलोपासून एक किलोपर्यंतचे लाडू उपलब्ध होत असल्याने मोतीचुराचे लाडूपासून तिरंगी मोदक, काजू मोदक, ड्रायफ्रूट मोदक तसेच विविध प्रकारच्या मिठार्इंचा खप होत असल्याने चांगला व्यवसाय होतो.

पूजा साहित्य

गणेशोत्सवामध्ये दररोज श्रींची पूजा केली जाते शिवाय श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन आवर्जून केले जाते. पूजेच्या साहित्यामध्ये धूप, अगरबत्ती, कापूर, वस्त्र, बुक्का, तुपाच्या तयार वाती प्रसादासाठी लागणाºया वस्तूंची खरेदी प्राधान्याने केली जाते. चांगल्या प्रतिचे साहित्य खरेदीसाठी प्राधान्य आहे.

फुलांची विक्री

ताज्या फुलांचा वापर सजावटीबरोबर पूजेसाठी केला जातो. त्यामुळे हार, सुटी फुले, गणपतीसाठी किरीट / मुकुट, बाजूबंद यांना विशेष मागणी होती. वेण्या / गजरे यांचाही खप मोठ्या प्रमाणावर होतो. याशिवाय दुर्वांच्या जुड्या, दुर्वा हार, झेंडू, गुलाब, शेवंती, जरबेरा तसेच सजावटीसाठी डेलियाला विशेष मागणी होते.

सजावटीसाठी खर्च

मुंबई, पुण्यातील गणेशमूर्तींचे आकर्षण अधिक असल्यामुळे त्या प्रकारे गणेशमूर्ती साकारण्याची गळ मूर्तिकारांना घातली जाते. त्याशिवाय आकर्षक रंगकामामुळे गणेशमूर्ती फारच मोहक दिसते. रंगकामाबरोबर गणेशमूर्तीचे पितांबर, शेला खरा वापरण्याबरोबर सिंहासन, मुकुट, दागिन्यांसाठी खडे, कुंदन यांचा वापर प्राधान्याने केला जात आहे.

दागिन्यांना पसंती

गौरी गणपतीसाठी काही भाविक सोन्या, चांदीचे दागिने, पूजेसाठी ताम्हण, निरांजन, तांब्या, पेला, विडा, समई खरेदी करतात. तर काही भाविक इमिटेशन ज्वेलरी विकत घेत असतात. त्यामुळे उत्सव कालावधीत सोन्याचांदीच्या व्यवसायातही चांगली उलाढाल होते.

फळांना मागणी

ऋषीपंचमी, गौरीपूजनासाठी विविध भाज्या, फळे, याशिवाय केळीची पाने, हळदीची पाने यांचा खप बºयापैकी होतो. विसर्जनादिवशी सर्व फळांचा एकत्रित प्रसाद तयार केला जातो. मोदकांसाठी नारळाला विशेष मागणी असते. यामुळे फळे, भाज्या, नारळ विक्रीतून बºयापैकी उलाढाल होते.

भजन, आरतीसाठी टाळ वापरण्यात येत असल्याने या दिवसात टाळ खरेदी आवर्जून केली जाते. पितळी टाळेसाठी विशेष मागणी असल्याने वर्षभरातील सर्वाधिक खप उत्सव कालावधीत होतो गणेशोत्सव कालावधीत आरती, भजनांचा कार्यक्रम घरोघरी होत असल्याने ढोल, मृदंगाना विशेष मागणी असते. त्यामुळे परराज्यातील ढोलकी व्यवसायिकांनी चांगली कमाई केली.

 

Web Title: Bappa steps to Ratnagiri market, Kotikote flights