मुलाच्या अपहरणप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी
By Admin | Updated: June 24, 2016 01:11 IST2016-06-24T00:33:58+5:302016-06-24T01:11:13+5:30
रत्नागिरीतील प्रकार : सामाजिक संस्थांची जागरूकता

मुलाच्या अपहरणप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी
रत्नागिरी : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला वाम मार्गाला लावणाऱ्या संदीप प्रकाश यादव याला मुख्य न्यायदंडाधिकारी बी. डी. कुलकर्णी यांनी दोन वर्ष सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर बाल न्याय कायदा व संरक्षण अधिनियमानुसार ४ महिने सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षाही त्याला सुनावण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड येथील एका आठ वर्षाच्या मुलाला त्याचे मद्यपी वडील रोज मारहाण करत असत. या रोजरोजच्या मारहाणीला कंटाळलेल्या या मुलाने घरातून पळ काढत मुंबई गाठली. त्यावेळी संदीप प्रकाश यादव (रा. चापोली सरोदयवाडी देवरुख) याला तो सापडला. संदीपने त्या मुलाला आईवडिलांकडे सोडतो, असे सांगून मुंबईतून थेट रत्नागिरीत आणले. रत्नागिरीत रेल्वे स्टेशन येथे आणून त्याला मारहाण करून नशा करण्यासाठी जबरदस्ती केली. संदीप त्याला मारहाण करून भीक मागण्यासाठी प्रवृत्त करत होता.
एक दिवस चाईल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक प्राची प्रकाश जाधव यांना हा मुलगा दिसला. त्यांनी याबाबतची माहिती बाल संरक्षण अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांना दिली. त्यानुसार त्यांनी संदीप यादव याच्याविरोधात शहर पोलिस स्थानकात २६ आॅक्टोबर २०१५ला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक चित्रा मढवी करत होत्या. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पुरावे ग्राह्य मानून मुख्य न्यायदंडाधिकारी बी. डी. कुलकर्णी यांनी संदीपला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. एस. ए. फर्नांडिस यांनी काम पाहिले. (वार्ताहर)