तिवरेतील उर्वरीत घरांसाठी ७ कोटींचा निधी देणार : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 17:31 IST2021-07-02T17:29:09+5:302021-07-02T17:31:26+5:30
Uddhav Thackeray Tiwre Dam Ratnagiri : तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

तिवरेतील उर्वरीत घरांसाठी ७ कोटींचा निधी देणार : उद्धव ठाकरे
रत्नागिरी : तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धीविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनासाठी जी मदत केली त्या मदतीमुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले आहे, असे म्हणता येईल. त्यांनी कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला आणि थेट नागरिकांना केलेल्या मदतीचाही यावेळी उल्लेख केला.
तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देतांना आजुबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडण्याची शक्यता नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, निसर्गाची ताकत मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन राज्यभरात अशाप्रकारे घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. वित्त हानी भरून काढता येते. परंतु, मनुष्यहानी ही न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मंत्री उदय सामंत यांनी यावेळी तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करतांना उर्वरित घरांच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपये लागणार असून, हा निधी लवकरात लवकर मिळाल्यास उर्वरित बाधित कुटुंबांनाही हक्काचा निवारा लवकर मिळू शकेल, अशी मागणी केली.
सिद्धीविनायक मंदिराने या आपत्तीच्या प्रसंगात तिवरे धरणग्रस्तांच्या पाठीशी उभे राहतांना त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे आदेश बांदेकर म्हणाले. हा पैसा भाविकांनी मंदिरात दान केलेला पैसा आहे तो राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी वापरण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्राची मिळून प्रत्येकी ६ लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आल्याची, पशुधनाच्या हानीपोटी ३ लाख रुपयांच्या रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.