वर्षभरात ११ बिबट्यांना वन खात्याकडून जीवदान
By Admin | Updated: June 23, 2016 01:17 IST2016-06-23T00:09:32+5:302016-06-23T01:17:28+5:30
बिबट्यांच्या संख्येत वाढ : शिकारीच्या प्रकारांमध्ये कमालीची घट
वर्षभरात ११ बिबट्यांना वन खात्याकडून जीवदान
सुभाष कदम -- चिपळूण -वन विभागातर्फे सध्या शिकारीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. शिकार करताना जर कोणी सापडले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात एकाही बिबट्याचा फासकीत अडकून मृत्यू झालेला नाही. विहिरीत पडून व रस्ते अपघात तसेच नैसर्गिकरित्या ६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे तर ११ बिबट्यांना वनखात्याने जीवदान दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ८२४८.८ भौगोलिक क्षेत्र असून, त्यापैकी ०.८ टक्के एवढे वनक्षेत्र आहे. हे सरकारी वनक्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे. मात्र, हे क्षेत्र विखुरलेल्या स्वरुपात असून, सह्याद्रीच्या कडेकपारीत व समुद्राच्या खाजण भागात हे क्षेत्र आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्र हे खासगी मालकीचे आहे. कोकणात बऱ्यापैकी जंगल अस्तित्वात आहे. त्यामुळे येथे विविध प्रकारचे पशु-पक्षी, प्राणी आढळतात. बिबट्यांची संख्या येथे जास्त आहे. त्यामुळे येथे शिकाऱ्यांची संख्याही कमालीची वाढली होती. परंतु, गेल्या वर्षभरात शिकारीची जी प्रकरणे घडली त्यामध्ये सामील असणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे शिकारीचे प्रमाण नियंत्रित झाले आहे. अलोरे व मुर्तवडे येथे बिबट्याचे कातडे सापडले होते तर खवल्या मांजराच्या खवले तस्करीचा प्रकारही घडला होता. ही सर्व प्रकरणे आता न्यायप्रविष्ठ झाली आहेत. त्यामुळे राजरोस शिकार करणाऱ्यांवर आता टाच आली
आहे.
२०१५-१६ या वर्षात ४९५ पाळीव जनावरांच्या दुर्घटनांची प्रकरणे घडली. त्या जनावरांच्या मालकांना २७ लाख ७३ हजार रुपये नुकसानभरपाई वन विभागातर्फे देण्यात आली. कोकणात मोठ्या प्रमाणात भात, नाचणीची लागवड केली जाते. सह्याद्रीच्या पायथ्याला असलेल्या गावांमध्ये वन्य प्राणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. अशा शेती नुकसानीच्या १२५ घटना घडल्या असून, या शेतकऱ्यांना ३ लाख ३० हजार रुपये नुकसान भरपाईपोटी देण्यात आले आहेत.
बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली असून, सन २०१५मध्ये फासकीत अडकलेल्या ४ बिबट्यांची सुटका करण्यात आली तर विहिरीत पडलेल्या ७ बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. विहिरीत पडून ३ बिबट्यांचा मृत्यू झाला. रस्ते अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला तर २ बिबटे हे नैसर्गिकरित्या मृत्यूमुखी पडले. सन २०१४ व २०१५ या दोन वर्षात फासकीत अडकून एकाही बिबट्याचा मृत्यू झालेला नाही.
काही ठिकाणी बिबट्यांची शिकार करण्याचा प्रयत्न केला जातो. मुर्तवडे येथे नेवरेकर याने बिबट्याची शिकार केली होती. त्याच्यावर गेल्यावर्षी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. एकूणच वनखात्याच्या कारभारामध्ये गतीमानता आली असून, नागरिकांमध्येही जनजागृतीही होत आहे. त्यामुळे लाकूडतोडीचे प्रमाणही घटले आहे.
1फासकीत अडकून बिबट्यांच्या मृत्यू होण्याच्या घटना २०१० ते २०१३ पर्यंत घडल्या होत्या. २०१४ व २०१५ मध्ये व आजअखेर एकाही बिबट्याचा फासकीत अडकून मृत्यू झालेला नाही. त्यामुळे फासकी लावण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. २०१० मध्ये ३, २०११ मध्ये २, २०१२ मध्ये २ तर २०१३ मध्ये ४ बिबट्यांचा फासकीत अडकून मृत्यू झाला होता. सध्या ग्रामीण भागात बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. काही भागात तर राजरोस बिबट्याचे दर्शन घडते.
2शासकीय वन जमिनीचे व जंगलाचे रक्षण वनखात्यातर्फे केले जाते. परंतु, आपल्याकडे खासगी वनक्षेत्र जास्त आहे. तेथे शिकारीसारख्या घटना घडत असतात. तक्रारी आल्यानंतर आम्ही कारवाई करतोच. शिकारीच्या ज्या ज्या घटना घडल्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. कोळसाभट्टी लावणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत २२ कोळसाभट्टया उध्वस्त करण्यात आल्या असल्याचे विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांनी सांगितले.