ब्रिटिश इतिहासकारांच्या सुरुवातीच्या प्रभावामुळे, भारतीय इतिहासात अनेक चुकीच्या गोष्टी नोंदवल्या गेल्या. यात जोधाबाई आणि मुघल सम्राट अकबर यांच्या लग्नाच्या कहाणीचाही समावेश आहे. एवढेच नाही तर, अकबरनाम्यात जोधा-अकबर लग्नाचा कसलाही उल्लेख नाही, असा दावाही राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. ते बुधवारी सायंकाळी उदयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्तकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे. भारमल नावाचा एक राजा होता आणि त्याने एका दासीकन्येचे लग्न अकबराशी लावून दिले होते."
बागडे पुढे म्हणाले, "इंग्रजांनी आपल्या नायकांचा इतिहास विकृत केला. त्यांनी तो इतिहास व्यवस्थित लिहिला नाही आणि सुरुवातीला त्यांनी लिहिलेला इतिहास खरा मानला गेला. मात्र नंतर, काही भारतीयांनी इतिहास लिहिला, पण तरीही त्यावर ब्रिटिशांचा प्रभाव होता."
'महाराणा प्रतापांसंदर्भात कमी शिकवलं जातं...'यावेळी राज्यपाल बागडे यांनी, राजपूत शासक महाराणा प्रताप यांनी अकबराला तहासाठी पत्र लिहिले होते, या एतिहासिक दाव्यांचेही खंडण केले. हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचेही ते म्हणाले. तसेच, "महाराणा प्रताप यांनी कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. इतिहासात अकबराबद्दल अधिक आणि महाराणा प्रतापांबद्दल कमी शिकवले जाते," असेही बागडे म्हणाले.
तथापि, "आता परिस्थिती सुधारत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आपली संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपून भविष्यातील आव्हानांसाठी नवीन पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असेही बागडे यावेळी म्हणाले.