विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर
By निखिल म्हात्रे | Updated: September 6, 2022 15:24 IST2022-09-06T15:21:11+5:302022-09-06T15:24:27+5:30
जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर
अलिबाग - गौरी गणपती विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. जाताना प्रवासात कोणताही अडथळा न येण्यासाठी 28 व 29 पर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा एकूण 217 जणांचा बंदोबस्त मुंबई-गोवा महामार्गावर ठेण्यात आला आहे. त्यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्या गणपतीचे दर्शन ही घेता आले नाही. मात्र नागरीकांची सेवा करणे हाच गणेशाचा मोठा आशीर्वाद असल्याचे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर या ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास यावेळी प्रवाशांना जाणवला नाही. त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावरील खड्डेही भरण्यात आल्याने कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकारक झाला आहे.
पाच दिवसाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर कोकणातून ठाणे, मुंबई, पुण्याकडे परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांनी विषेश खबरदारी घेत महत्वाच्या स्पॅटवर 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 6 पोलीस निरीक्षक, 13 सह. पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 217 पोलीस कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक स्तरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांचा प्रवास सुखकर होणार हे निश्चित.
गणपती विसर्जनानंतर गणेशभक्त मुंबई पुण्याकडे परतणार असल्याने रस्ता मोकळा करण्यासाठी विषेश मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली आहे. तसेच वाहतूक कोंडी होऊन नये याकरीता माणगाव मधून काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. या गणेशभक्तांनी नियमांचे पालन करीन गाडी चालविल्यास प्रवास सुखकर होणार हे निश्तच अशी प्रतिक्रिया वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.