Irshalwadi Raigad News आई, बाबा, भाऊ नाय...कोण नाय राहिला: इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 11:08 IST2023-07-20T10:33:03+5:302023-07-20T11:08:40+5:30
Raigad Irshalwadi Landslide: रात्री ११ वाजता ही घटना घडल्यानंतर जवळपासच्या गावातील तरूण मदतीसाठी धावले.

Irshalwadi Raigad News आई, बाबा, भाऊ नाय...कोण नाय राहिला: इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांचा आक्रोश
रायगड – खालापूरनजीक इर्शाळवाडीवर रात्री दु:खाचा डोंगर कोसळला, सततच्या अतिवृष्टीमुळे या परिसरात दरड कोसळली आणि त्यात ४०-५० घरे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. २५० लोकांची वस्ती असलेल्या या भागात सुमारे १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्रीपासून याठिकाणी मदत कार्य सुरू आहे. NDRF ची टीम मलब्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे.
या घटनेनंतर पीडितांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. आई, बाबा, भाऊ कोण नाय राहिला म्हणत महिलेने हंबरडा फोडला. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी याठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे. नणंद, पोरगं कुणीच उरले नाही. इर्शाळवाडीतील या दुर्घटनेत ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बचाव पथकाला ८० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दुर्घटनेतील जखमींवर नवी मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्री ११ वाजता ही घटना घडल्यानंतर जवळपासच्या गावातील तरूण मदतीसाठी धावले. रसायनी येथील काही तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. या वस्तीपर्यंत जाण्यासाठी खूप कठीण रस्ता आहे. जवळपास २ तास वरती पोहचायला लागले. आम्ही मदतीसाठी वर पोहचताना माझ्यासमोर बेलापूर येथील अग्निशमन दलातील एक कर्मचारी वाटेतच कोसळले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. याठिकाणी ५०-६० घरांची वस्ती आहे. आम्ही इथं ट्रेकला यायचो. आता याठिकाणी केवळ १०-१२ घरे उरल्याची दिसून येते. बाकी काहीच दिसत नाही असं मदतीसाठी आलेल्या तरूणांनी म्हटलं.
दरम्यान, सुरुवातीला आम्ही एका लहान मुलाला बाहेर काढला. NDRF ची टीम पोहचल्यानंतर आम्ही त्यांना मदत केली. मंदिरात ५ लहान मुले मोबाईलवर खेळत होती. त्यांनी काही जणांना फोन करून घटनेची माहिती दिली. ५० फूटाचा गाळ याठिकाणी तयार झाला आहे. ही घरे १० फूट गाळात अडकली असावी अशी विदारक स्थिती वरती आहेत. जी घरे शिल्लक आहेत त्यात अनेकांची पडझड झालेली आहे. डोंगरदऱ्यात ही दुर्घटना झाल्याने शोधपथकाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.