मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद असलेला पक्ष आता लुळापांगळा

By राजेश भोस्तेकर | Updated: March 23, 2026 09:56 IST2026-03-23T09:56:23+5:302026-03-23T09:56:43+5:30

रायगड जिल्ह्यात एकेकाळी बलाढ्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) १० वर्षांनंतर उतरती कळा लागली आहे.

party that has the power to decide the Chief Minister is now in shambles | मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद असलेला पक्ष आता लुळापांगळा

मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद असलेला पक्ष आता लुळापांगळा

रायगड डायरी, राजेश भोस्तेकर, प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात एकेकाळी बलाढ्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) १० वर्षांनंतर उतरती कळा लागली आहे. पूर्वी रायगड जिल्ह्यात शेकापशिवाय पान हलत नव्हते. मात्र, शेकापवर ६४ वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या सत्तेबाहेर राहण्याची वेळ  आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यास पक्षातील अंतर्गत राजकारण धूसफूस, नाराजी आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाला पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी नेत्यांनी राजकीय रणनीती आखणे गरजेचे आहे. अन्यथा हा देदिप्यपमान इतिहास असलेला पक्ष नावालाही शिल्लक राहणार नाही, अशी चर्चा आहे. 

रायगडाच्या राजकारणात ६४ वर्षे शेकापचा दबदबा होता. मात्र, १० वर्षांपासून पक्षात चढ-उतार सुरू आहेत. एकेकाळी शेतकरी भवनातून मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद पक्षात होती. मात्र, सद्य:स्थितीत हा पक्ष जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे, असं दुर्देवाने म्हटले जात आहे. 

शेकापच्या भूतकाळावर दृष्टिक्षेप टाकला तर जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत पक्षाचे आमदार निवडून येत होते. लोक त्यांना भरभरून मते देत होते. जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता येत होती. पक्षाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद १० मिळवले. जिल्हा परिषद आणि शेकाप एक नाते होते. मात्र, २०२६ च्या निवडणुकीत शेकापचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. सत्तेबाहेर राहण्याची नामुष्की पक्षावर आलेली आहे.

अनेक शिलेदारांनी सोडली साथ

सन २००५मध्ये पक्षाने शिवसेनेशी युती तोडली. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी शिवसेनेशी जिल्हा परिषदेची आघाडी तोडली. त्यानंतर शेकापने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली. २०२२ पर्यंत शेकाप जिल्हा परिषदेत सत्तेत होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत शेकापला फारसा प्रभाव पाडता आला नाही. 

अनेक शिलेदार शेकापला सोडून गेले. पाटील यांनी सुनबाई चित्रलेखा यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. त्यामुळे अंतर्गत नाराजी वाढली. जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील, भाचा आस्वाद पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे घराण्यातच वाद निर्माण झाला. २०२६च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षावर उमेदवार शोधण्याची वेळ आली. पक्षाचा पराभवाला सामोरे जावे लागणे, हेही एक पक्षाच्या वाताहतीचे कारण आहे. 

शेकाप हा कामगार आणि शेतकरीवर्गाचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाकडे तरुण नेतृत्वाचा अभाव आहे. नेतेमंडळींचा एकहाती सत्ता राबविण्याचा हेका होता. त्यामुळे पक्षाची वाताहत होत गेली. पक्षाला आता पुन्हा उभे राहण्यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. लोकांच्यात उतरून आपल्या पक्षाची भूमिका मांडणे आवश्यक आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शेकापला पक्षवाढीसाठी प्रचंड मेहनतीची गरज आहे, हे नक्की.

Web Title : कभी शक्तिशाली, अब कमजोर पार्टी अपनी शक्ति वापस पाने के लिए संघर्ष कर रही है।

Web Summary : रायगढ़ की शेकाप, जो कभी शक्तिशाली थी, सत्ता से बाहर रहने के 64 वर्षों बाद गिरावट का सामना कर रही है। आंतरिक संघर्ष, नेतृत्व परिवर्तन और प्रमुख सदस्यों का नुकसान इसके संघर्ष में योगदान करते हैं। पुनरुद्धार के लिए रणनीतिक योजना और लोगों से जुड़ने की आवश्यकता है।

Web Title : Once mighty, the weakened party struggles to regain its power.

Web Summary : Raigad's SheKaP, once powerful, faces decline after 64 years out of power. Internal conflicts, leadership changes, and loss of key members contribute to its struggle. Revival requires strategic planning and connecting with the people.