चवदार तळे शताब्दी वर्षात भेदभावमुक्ती...; महाडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 10:49 IST2026-03-21T10:49:03+5:302026-03-21T10:49:30+5:30
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी...

चवदार तळे शताब्दी वर्षात भेदभावमुक्ती...; महाडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
महाड : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चवदार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात आली.
चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी ५५ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
बुद्धगया येथे महाराष्ट्र भवन मुख्यमंत्री फडणवीस
यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिलेला निधी, चैत्यभूमीवरील स्मारकाचे काम, तसेच लंडन व जपानमध्ये बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
याशिवाय बुद्धगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णयही जाहीर केला. बाबासाहेबांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यासन स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
आठवलेंचे अनोख्या काव्य शैलीत भाषण
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनोख्या काव्य शैलीत भाषणाची सुरुवात केली. चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भव्य ‘भीमसृष्टी’ स्मारक उभारण्याची मागणी केली. तसेच संविधान अत्यंत मजबूत असून ते बदलण्याच्या अफवा निराधार असल्याचे ते म्हणाले.
९८ वारसांना शासकीय सेवेत नियुक्तीचे आदेश
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील वारसांना शासकीय व निमशासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील पहिले राज्य आहे. एकूण ९८ वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय सेवेत नियुक्ती आदेश वितरण केल्याची माहिती देण्यात आली.
महाडमध्ये ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी
आ. भरत गोगावले यांनी रायगड येथे ‘शिवसृष्टी’ आणि महाड येथे ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी केली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार सुनील तटकरे, खा. धैर्यशील पाटील, आ. प्रवीण दरेकर, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, डॉ. हर्षदीप कांबळे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलिस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होते.